10,500 रिक्त जागांसाठी लवकरच पोलीस भरती
प्रतिनिधी -महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. पुणे, मुंबईसह राज्यातील विविध भागांमध्ये वाढती गुन्हेगारी आणि पोलिस दलातील तुटवडा हा महत्त्वाचा मुद्दा बनला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात या विषयावर चर्चा झाली असता, मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 10,500 रिक्त जागांसाठी लवकरच पोलीस भरती होणार असल्याची मोठी घोषणा केली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागपूरमधील घटनेचा संदर्भ देत स्पष्ट केले की, पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना कठोर शिक्षा केली जाईल. महाराष्ट्रातील शांतता कोणीही भंग करू नये, आणि जर कोणी तसा प्रयत्न केला, तर त्याला कोणतीही सवलत दिली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
2025-26 च्या अर्थसंकल्पात गृह विभागासाठी 36,614 कोटी 68 लाख 9 हजार रुपये इतकी मोठी तरतूद करण्यात आली आहे. या निधीचा उपयोग पोलीस भरती, यंत्रणा सुधारणा, तांत्रिक सुविधा आणि सुरक्षेसाठी करण्यात येणार आहे.दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, राज्य सरकार गुन्हेगारी प्रवृत्तींवर कठोर कारवाई करत आहे. 2023 च्या तुलनेत 2024 मध्ये गुन्ह्यांमध्ये 2,586 प्रकरणांनी घट झाली आहे. तसेच देशातील पहिल्या पाच गुन्हेगारी शहरांच्या यादीत महाराष्ट्रातील कोणतेही शहर नाही. त्यामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था तुलनेने अधिक चांगली असल्याचा दावा त्यांनी केला.
