श्री क्षेत्र महाबळेश्वर विकास आराखड्यावर मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक; गावठाण प्रश्न सोडवण्यासाठी सकारात्मक संकेत
प्रतापगड प्रतिनिधी-श्री क्षेत्र महाबळेश्वर या राज्यातील प्रमुख धार्मिक पर्यटन स्थळाच्या सर्वांगीण विकासासाठीचा आराखडा आणि स्थानिकांच्या गावठाण संदर्भातील समस्यांवर सखोल चर्चा करण्यासाठी मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मकरंद आबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात ही बैठक झाली.
राजेंद्र शेठ राजपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री क्षेत्र महाबळेश्वर येथील ग्रामस्थांचे शिष्टमंडळ या बैठकीत सहभागी झाले. यावेळी पर्यटन वाढीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा, पर्यटकांच्या सोयी-सुविधा, तसेच गावाच्या विकासासाठी लागणाऱ्या योजनेविषयी सविस्तर चर्चा झाली.
बैठकीत सर्वात महत्त्वाचा आणि गुंतागुंतीचा मुद्दा असलेल्या गावठाण प्रश्नावर सकारात्मक चर्चा झाली. महसूल विभागातील संबंधित अधिकाऱ्यांशी मंत्री पाटील यांनी थेट संवाद साधला. बैठकीनंतर ग्रामस्थांना लवकरच आनंदाची बातमी मिळेल, असे संकेत मंत्री पाटील यांनी दिले. प्रशासन स्थानिकांच्या हिताला प्राधान्य देत, ग्रामस्थांना केंद्रस्थानी ठेवून आणि त्यांचे हक्क सुरक्षित ठेवत सोडवण्याच्या भूमिकेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या विकास आराखड्यामुळे महाबळेश्वर परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार असून स्थानिक अर्थव्यवस्थेला गती मिळेल. पर्यटनाच्या वाढत्या संधींमुळे स्थानिक व्यवसायांना चालना मिळून नागरिकांचे जीवनमान उंचावेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या बैठकीत ग्रामस्थांच्या अपेक्षा, मागण्या आणि विकासाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या योजना एकत्रित करून पुढील कार्यवाहीसाठी दिशा निश्चित करण्यात येईल. श्री क्षेत्र महाबळेश्वरचा विकास आराखडा राबवल्यास, हे ठिकाण केवळ धार्मिकच नव्हे तर आर्थिक आणि सांस्कृतिक केंद्र म्हणूनही अधिक सक्षम होईल, असा आशावाद उपस्थितांनी व्यक्त केला.





