विधानपरिषदेसाठी भाजपची तीन नावे ठरली; माधव भंडारीसह ‘ही’ दोन नावे दिल्लीला पाठवली
प्रतिनिधी -विधानसभा निवडणुकांनंतर रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी 27 मार्च रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपने तीन उमेदवारांची यादी दिल्लीला पाठवली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. यामध्ये दादाराव केचे, अमरनाथ राजूरकर आणि माधव भंडारी यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यामुळे आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर महायुतीमधील आमदारांच्या जागांवर कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपासह सध्या शिवसेनेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये या जागांसाठी जोरदार लॉबिंग सुरू असून 27 मार्चला या पाच जागांसाठी मतदान होणार आहे.
विधानसभेतील सध्याचे संख्याबळ पाहाता भाजपाचे तीन, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) एक आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचा एक आमदार निवडून येऊ शकतो. याच पक्षाच्या जागा सध्या रिक्त झाल्या आहेत. आता, उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाल्याने राजकीय पक्षांकडून उमेदवारांच्या नावासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
त्यामध्ये भाजपकडून तीन नावे दिल्लीला पाठविण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत विधानपरिषदेवर असलेले भाजपचे आमदार, प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर आणि रमेश कराड यांच्यासह शिवसेनेकडून आमशा पाडवी आणि अजित पवार गटाकडून राजेश विटेकर यांच्या जागा रिक्त झाल्या आहेत.
माधव भंडारी हे भाजपाचे ज्येष्ठ नेते असून त्यांनी दीर्घकाळ पक्षाचे प्रवक्ते म्हणून काम केले आहे. ते अनेक वर्षांपासून विधानपरिषदेच्या आमदारकीसाठी इच्छूक होते. पण, त्यांना आजवर नेहमीच आमदारकीने हुलकावणी दिली आहे. आता यंदा त्यांच्या नावाचा पक्षाने समावेश केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
राष्ट्रवादीकडून या नावाची चर्चा?
राष्ट्रवादीकडून पक्षात सध्या झिशान सिद्धकी, आनंद परांजपे, सुरेश बिराजदार, संजय दौंड आणि सुबोध मोहिते इच्छुक आहेत. मात्र, एकच जागा राष्ट्रवादीची असल्याने कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
निवडणूक कार्यक्रम
10 मार्चपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात
17 मार्च ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख
18 मार्चला उमेदवारी अर्ज यांची छाननी होणार
20 मार्च अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख
27 मार्चला सकाळी नऊ ते संध्याकाळी चार या वेळेत मतदान प्रक्रिया
27 मार्चला संध्याकाळी पाच वाजता मतमोजणीला सुरुवात होऊन निकाल जाहीर




