नेपाळमध्ये महाप्रलयाचा कहर; 587 मृत्यू, 320 भारतीय अद्याप बेपत्ता

नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत 587 जणांचा मृत्यू झाला असून, सुमारे 2,500 जण बेपत्ता आहेत. या संकटात मोठ्या संख्येने भारतीय नागरिकही अडकले आहेत. सुमारे 320 भारतीय आणि भारतीय वंशाच्या 100 नागरिकांशी अद्याप संपर्क होऊ शकलेला नाही.
दरम्यान, दुसरीकडे तिबेटमध्ये असलेल्या सुमारे 400 भारतीयांशी संपर्क झाला असून, ते सुरक्षित असल्याची माहिती आहे. डोंगराळ भागात बचाव आणि मदतकार्य अद्याप सुरू आहे. त्यातच भोटेकोशी नदीजवळ पुन्हा पाण्याची पातळी वाढू लागल्याने नव्या पुराचा धोका निर्माण झाला आहे. मात्र, शनिवारी सकाळी 6:30 वाजेपर्यंत भोटेकोशी आणि त्रिशूली नदीचा प्रवाह सामान्य असल्याचे सांगण्यात आले.
या भीषण आपत्तीची सुरुवात डोंगराळ भागातील उंच प्रदेशातून झाली. प्राथमिक तपासानुसार, हिमनगाचा (ग्लेशिअर) काही भाग तुटल्यानंतर बर्फ, खडक आणि मोठ्या प्रमाणातील मलबा खाली आला. हा मलबा नदीत जमा झाल्याने काही काळ नदीचा प्रवाह अडला.
त्यानंतर नैसर्गिक अडथळ्याची भिंत तुटली आणि पाण्यासोबत माती, दगड व मलब्याचा प्रचंड वेगाने प्रवाह खाली आला. यामुळे भोटेकोशी आणि त्रिशूली नदीच्या परिसरातील अनेक वस्त्या, रस्ते, पूल आणि जलविद्युत प्रकल्पांचे मोठे नुकसान झाले.
पुरानंतर बेपत्ता नागरिकांचा शोध घेणे हे बचाव पथकांसमोरील सर्वात मोठे आव्हान ठरले आहे. डोंगराळ भागातील अनेक रस्ते आणि पूल वाहून गेल्याने बचाव पथकांना दुर्घटनास्थळी पोहोचण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. नेपाळ रेड क्रॉसच्या माहितीनुसार, या आपत्तीचा 90 हजारांहून अधिक नागरिकांना फटका बसला आहे.
पुराचा फटका जलविद्युत प्रकल्पांनाही बसला आहे. 13 जलविद्युत प्रकल्पांशी संबंधित सुमारे 933 कर्मचारी बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यापैकी 254 जणांची सुटका करण्यात आली आहे. तर काही कर्मचारी अजूनही बोगद्यांमध्ये अडकले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एकट्या अपर त्रिशूली-1 जलविद्युत प्रकल्पातील तब्बल 576 कर्मचाऱ्यांचा अद्याप शोध लागलेला नाही.
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माहितीनुसार, नदीच्या प्रवाहात तयार झालेल्या तात्पुरत्या तलावामुळे धोका अद्याप कायम आहे. सध्या नद्यांचा प्रवाह सामान्य असला तरी वरच्या भागात साचलेले पाणी आणि मलब्याच्या स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे भोटेकोशी आणि त्रिशूली नदीच्या आसपास राहणाऱ्या नागरिकांसह प्रवासी आणि बचाव पथकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
या संकटाच्या पार्श्वभूमीवर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडूनही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ताज्या माहितीनुसार, 320 भारतीय आणि भारतीय वंशाच्या 100 नागरिकांशी अद्याप संपर्क होऊ शकलेला नाही. यापैकी सुमारे 100 जण त्रिशूली जलविद्युत प्रकल्पात अडकले असल्याची माहिती आहे.
मात्र, दिलासादायक बाब म्हणजे तिबेटमध्ये असलेल्या सुमारे 400 भारतीयांशी संपर्क झाला असून ते सुरक्षित आहेत. तसेच सीमेच्या परिसरात अडकलेले 96 भारतीय नेपाळमध्ये पोहोचले आहेत. भारतीय हवाई दलाकडून आतापर्यंत दोन खेपांमध्ये पूरग्रस्तांसाठी आवश्यक मदत साहित्य पोहचवण्यात आले आहे.
पुराच्या तडाख्यात 36 हून अधिक पूल वाहून गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे नागरिकांपर्यंत अन्नधान्य, औषधे आणि इतर जीवनावश्यक वस्तू पोहोचवण्यात अडचणी येत आहेत. रस्ते आणि वाहतूक व्यवस्था लवकर पूर्ववत करण्यासाठी नेपाळने भारत आणि चीनकडे 42 बेली ब्रिज उभारण्यासाठी मदत मागितली आहे.
दरम्यान, बचाव आणि मदतकार्यात लष्कराच्या 2,391 जवानांसह एकूण 7,451 सुरक्षाकर्मी सहभागी झाले आहेत. बचाव पथके मलब्यात बेपत्ता नागरिकांचा शोध घेत आहेत. त्याचवेळी भोटेकोशी नदीच्या वरच्या भागात तयार झालेल्या तात्पुरत्या तलावावरही सतत लक्ष ठेवले जात आहे.
ताज्या माहितीनुसार, सध्या भोटेकोशी आणि त्रिशूली नदीचा प्रवाह सामान्य असला तरी नेपाळवरील संकट पूर्णपणे टळलेले नाही. नदीच्या वरच्या भागात साचलेल्या पाण्यामुळे तयार झालेला तात्पुरता तलाव ही सर्वात मोठी चिंता आहे. हा नैसर्गिक अडथळा तुटल्यास खालील भागात अचानक पुराचा धोका निर्माण होऊ शकतो.



