कुसुंबी गटात परिवर्तनाचा गुलाल; शिवसेनेच्या विजयाने जावळीत उत्साह
मेढा प्रतिनिधी:जिल्हा परिषद निवडणुकीत जावळी तालुक्यातील कुसुंबी गटात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवून मतदारांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करण्याची संधी दिली असून कुसुंबी गट विकासकामांच्या बाबतीत अग्रेसर ठेवण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे. अशी ग्वाही कुसुंबी जिल्हा परिषदेच्या गटाच्या नवनिर्वाचित सदस्या कविताताई ओंबळे यांनी दिली.
कुसुंबी गटातून निवडून आल्याबद्दल कुसुंबी गटातील गावांमध्ये मतदारांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. यावेळी शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख एकनाथ ओंबळे, पंचायत समिती सदस्य आतिश कदम ,पंचायत समिती सदस्या सुनीता दुंदुळे,शिवसैनिक व राष्ट्रवादी चे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

कविताताई ओंबळे म्हणाल्या, जावळी तालुक्यात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. ते प्रश्न प्राधान्याने सोडवण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून काम करणार असून दुर्गम डोंगराळ जावळी तालुक्यातील महिलांच्या हाताला काम देण्यासाठी व शाश्वत उपाययोजना करण्यासाठी लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला जाईल. एकनाथ ओंबळे म्हणाले, धनशक्ती विरुद्ध जनशक्ती या लढाईत जनशक्तीचा विजय झाला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीचे दोन्ही उमेदवार हे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील असल्याने मतदारांनी शिवसेनेच्या उमेदवारांना पसंती दिली आहे. मतदारांचा हा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून निश्चित प्रयत्न करू .उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून जावळी तालुक्याच्या विकासकामांसाठी राज्य सरकारकडून निधी उपलब्ध करून घेण्यासाठी काम करणार आहे.
बऱ्याच वर्षांनंतर शिवसेनेचे उमेदवार निवडून आल्याने शिवसैनिक उत्साहात विजयी रॅली मध्ये सहभागी झाले होते. गावोगावी विजयी उमेदवारांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. विजयी रॅली मध्ये महिला व युवकांचा सहभाग लक्षणीय होता.




