शालेय जीवनातील जुन्या आठवणींनी भारावले मन ५० वर्षातील विद्यार्थींनी जमल्या एकत्र, लोणंद येथील पवार विद्यालयात स्नेहमेळावा
खंडाळा : ‘ही आवडते मज मनापासून शाळा, लावीते लळा जसा माऊली बाळा’ या उक्तीस साजेसा असा लोणंद येथील प्रतिभाताई पवार विद्यालय व जुनिअर कॉलेज (मुली) या महाविद्यालयात गेल्या पाच दशकातील इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. गत पन्नास वर्षात एकत्र येण्याचा योग आल्याने सर्वांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. शाळेतील तत्कालीन शिस्त, मस्ती, अभ्यास, शिक्षकांचा वचक, क्रीडा स्पर्धा, स्नेहसंमेलनातील गमतीजमती अशा आठवणींनी वातावरण भारावून गेले.
या मेळाव्याचीची सुरुवात रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमा पूजनाने व दीपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी उपायुक्त विद्यादेवी पोळ, जिल्हा खणिकर्म अधिकारी मीनाक्षी माने उपस्थित होत्या. याचबरोबर डॉ. सुजाता सावंत, नगरसेविका दिपाली शेळके, अर्चना गायकवाड , डॉ.संगीता सावंत या उपस्थित होत्या.
प्रास्ताविकात विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सीमा अहिवळे यांनी विद्यालयात घेतल्या गेलेल्या पहिल्याच माजी विद्यार्थिनी मेळाव्यात सर्वांचे स्वागत करीत जुन्या आठवणींना उजाळा देत या विद्यार्थिनींच्या कार्याचे कौतुक केले .
माझी विद्यार्थिनी संघटना विभाग प्रमुख बोंद्रे यांनी संघटनेच्या स्थापनेचा उद्देश स्पष्ट केला. माजी विद्यार्थीनी कार्यकारिणी अध्यक्षा मनीषा काकडे , डॉ.सारिका सावंत, सीमा माडकर , प्रतिभा खरात , नाजिया शेख , दिपाली क्षीरसागर ,अश्विनी क्षीरसागर, सानिका नलावडे या माजी विद्यार्थिनींनी आपले मनोगतातून शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. शाळा स्थापनेच्या वेळच्या अहिंसादेवी काकडे व रत्नमाला गोवेकर या माजी विद्यार्थिनींची उपस्थिती व मनोगताने सर्वजण भारावून गेले. विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका सुनंदा नेवसे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी मीनाक्षी माने म्हणाल्या, “आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर योग्य करणे, शाळेतून संयम, आत्मविश्वास ,योग्य, अयोग्य समज मिळाली आणि मराठी शाळेत शिकल्याचा सार्थ अभिमान वाटतो.
विद्यादेवी पोळ म्हणाल्या, शिस्त ,परखडपणा शिक्षकांमुळे स्वतःमध्ये आला .याचबरोबर मुलींनी स्वतःचे करिअर करणे खूप महत्त्वाचे आहे. आपल्या मिळकती मधील काही भाग हा शाळेच्या प्रगतीसाठी दिला पाहिजे” असे आवाहन केले.
मेळाव्याचे आयोजन करण्यात रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य मिलिंद माने, स्थानिक स्कूल कमिटी सदस्य अनिलराजे निंबाळकर , सुनील शहा, व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा पल्लवी काटकर , सीमा अहिवळे , पर्यवेक्षक दत्ता गोळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभांगी ननावरे यांनी केले, स्वागत ज्योत्स्ना वगरे यांनी केले तर अनिता गायकवाड यांनी आभार मानले.




