सामाजिक कार्याचा दीपस्तंभ -मा.रविंद्र कांबळे
आपल्या अंगभूत हुशारी, कौशल्य, प्रामाणिकपणा , सचोटी आणि मेहनतीच्या जोरावर सामाजिक उपक्रमासोबत व्यवसायातही यशस्वी होतो व आपण समाजाचे काही देणे लागतो असे समजून सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून प्रचंड काम उभे करतो. प्रत्येक दिवशी नव क्षितीज शोधणारे अफाट उत्साही व्यक्तिमत्व संजीवन बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष श्री. रवींद्र उत्तम कांबळे यांचा 13 डिसेंबर रोजी वाढदिवस आहे त्यानिमित्त…
रवींद्र कांबळे म्हणजे यशस्वी उद्योजक प्रतिष्ठीत व्यापारी, प्रामाणिक विक्रेता ! ही भौतिक प्रगती ते केवळ औपचारिकता मानतात. आज पर्यंत केलेली समाजसेवा हे आपले कर्तव्य आहे परमेश्वर सर्व कार्य आपल्याकडून करून घेत असतो आपण मात्र निमित्तमात्र असतो. परमेश्वराने मला जे काही देत आहे त्यामागे त्याची काही योजना असावी त्यामुळेच माझे तन, मन आणि धन मी माझ्या समाजासाठी वापर करत असतो असे ते नेहमी म्हणतात. रवींद्र कांबळे यांचे कल्पक नेतृत्व नेहमीच समाजाला दिशा दर्शक ठरत आहेत.आपण समाजात एक घटक म्हणून जगताना आपला प्रत्येक श्वास हा समाजाचे देणे आहे. त्या बदल्यात आपण समाजासाठी जे करु ते थोडेच आणि त्यात कोणताही मोठेपणा नाही, हा अत्यंत प्रगल्भ आणि संस्कारक्षम विचार रवींद्र कांबळे यांचा आहे. काबाडकष्ट तर त्यांच्या पाचविलाच पुजलेले; गरिबी, अवहेलना, अपमान असे टक्के-टोणपे खात एक यशस्वी उद्योजक व्यापारी होऊनही त्यांचे पाय अद्यापी जमिनीवर आहेत. एखाद्या हिरो सारखी पर्सनॅलिटी, सर्वसामान्यांच्या दुःख आणि व्यथा जाणणार व्यक्तिमत्व म्हणजे रवींद्र कांबळेजीं.
कसेबसे दहावीपर्यंत शिक्षण झालेले, त्यांनी रस्यावर बसून भाजी विकली, रिक्षा टेम्पो चालविला, चहा विकला. कोणत्याही कामात कमीपणा मानला नाही. पितृछत्र हरपले तेव्हा रवींद्र १८ वर्षांचे होते. वडीलांच्या पश्चात आई शारदा यांनी मोठ्या कष्टाने रवींद्र यांच्यासह तिन्ही मुलांचे पालनपोषण केले. यु. एस. डिस्पोजेबल, यू. एस. पेपर प्रॉडक्ट, यू. एस. किरणा, जय गुरूदेव ट्रेडिंग कंपनी, जय गुरूदेव भाजी केंद्र असा व्यवसायांचा व्याप रवींद्र कांबळे यांनी वाढविला आहे. या व्यवसायांच्या माध्यमातून त्यानीं लोकांना रोजगार पुरविला आहे. अर्थातच या प्रगतीमध्ये रवींद्र यांचे धाकटे बंधू मिलिंद, बहिण सौ.अर्चना जमदाडे यांचा मोलाचा वाटा आहेच!
या भौतिक प्रगतीमुळे त्यांनी स्वतःचे मन सैरभैर होऊ दिले नाही. संजीवन बहुउद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्था स्थापन करुन त्यांनी आपली समाजाशी असलेली नाळ जपली. या संस्थेच्या माध्यमातून जिल्हा रुग्णालयात सिटीस्कॅन मशिन सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी त्यांनी यशस्वी लढा दिला. एखाद्या मृतदेहाला काही कारणाने २-३ दिवस ठेवावे लागणार असेल, तर त्याकरिता आवश्यक शितपेटीची येथे सोय नव्हती. हा प्रश्नही त्यांनी पाठपुरावा करून धसास लावला.
जिल्हा रुग्णालयात रुग्णांसोबत थांबणाऱ्या नातेवाईकांच्या संध्याकाळाच्या जेवनाची सोईअभावी अबाळ होत होती. परिस्थीतीमुळे खानावळीतून जेवण मागविणेही शक्य होत नाही. अशा वेळी रवी त्यांच्या मदतीला धावून गेले.हालाखिच्या परिस्थितीमुळे वडीलांचे अंत्यकर्मही त्यांना व्यवस्थीत करता आले नव्हते. त्याची सल आजही त्यांना मनात बोचत असते. ही परिस्थिती अन्य कोणावर ओढवू नये, या कर्तव्य भावनेतून त्यांनी अंत्यविधीचे साहित्य मोफत देण्याचा उपक्रम सुरू केला. कापड, ताट, गुलाल-बुक्का, अगरबत्ती आदी सुमारे ६०० ते ७०० रुपयांचे साहित्य ते गरजूंना मोफत देतात. सातारा शहर व परिसरच नव्हे तर ग्रामीण भागातूनही लोक हे साहित्य नेण्यासाठी ‘संजीवन’ संस्थेत येतात. बेवारस मृतदेहांच्या अंत्यसंस्कारांची सोय करण्याचा श्री कांबळे यांचा मानस आहे. त्याचबरोबर संस्थेच्या माध्यमातून ॲम्बुलन्स सेवा चालू करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे ते सांगतात
नेहमी सकारात्मक रहावे, स्वप्ने पहावीत. ती पूर्ण होण्यासाठी चांगल्या मार्गाने झटावे, ही त्यांची जीवनसूत्री आहे. मित्र, जनता, सहृदयी यांमुळेच मी आज हे सर्व करु शकतो व करीत राहिन, असे ते नम्रतेने नमूद करतात. ज्याला समाजकार्याची तळमळ आहे, तो स्वस्थ कधी बसूच शकत नाही, याचे रवींद्र कांबळे हे उत्तम व प्रेरणादायी उदाहरण आहे !आपल्या सेवेला सलाम! आजचा दिवस आपल्यासाठी सर्वात आनंदी आणि आनंददायी असो!
प्रतिनिधी
