बिहारमध्ये नितीश-मोदींची जादू
बिहार- बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए) वरचष्मा दिसत आहे. अनेक संस्था व माध्यमांनी दिलेले ओपिनियन व एक्झिट पोल खरे ठरत आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए) वरचष्मा दिसत आहे. अनेक संस्था व माध्यमांनी दिलेले ओपिनियन व एक्झिट पोल खरे ठरत आहेत. आतापर्यंत हाती आलेले निवडणुकीचे कौल पाहता महागठबंधनचा दारूण पराभव होत असल्याचं दिसत आहे. दुपारी एक वाजेपर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार एनडीए १९५ जागांवर आघाडीवर आहे. तर, महागठबंधन ४२ जागांवर पुढे आहे.
मतदारांचं विरोधकांबाबतचं बदलेलं मत, भाजपा-जदयूचा आक्रमक प्रचार, महिला व युवकांची निवडणुकीतील भूमिका या निकालांमध्ये निर्णायक ठरल्याचं चित्र दिसत आहे. सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीत उपस्थित केलेले मुद्दे, विकास, बेरोजगारी, जातीय समीकरणं, आक्रमक प्रचार आता निर्णायक ठरत आहे.
*एनडीएची द्विशतकाकडे वाटचाल*
दुपारी एक वाजेपर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार भारतीय जनता पार्टी ९० जागांवर आघाडीवर आहे. तर, जनता दलाचे (संयुक्त) ८१ उमेदवार पुढे आहेत. लोक जनशक्ती पार्टी देखील २० जागांवर आघाडीवर आहे. राष्ट्रीय लोक मोर्चाला देखील चार जागांवर आघाडी मिळाली आहे. यामुळे आता एनडीएची द्विशतकाकडे वाटचाल चालू झाली आहे. बिहारमध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची पुनरावृत्ती पाहायला मिळत आहे. दुसऱ्या बाजूला, महागठबंधनमधील पक्षांची दयनीय अवस्था झाल्याचं पाहायला मिळत आहे. राष्ट्रीय जनता दल २९ जागांवर, काँग्रेस एकेरी जागांवर समाधान मानावं लागेल असं दिसत आहे. कारण काँग्रेसचे उमेदवार ५ जागांवर आघाडीवर आहेत. बिहारमध्ये २४३ सदस्यांच्या सभागृहात एनडीए १२२ च्या बहुमताच्या टप्प्यापुढे गेली आहे.
*प्रशांत किशोर राजकारण सोडणार?*
निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी बिहार विधानसभा निवडणुकीआधी ‘जनुसराज पक्ष’ या स्वतःच्या पक्षाची स्थापना केली. त्यांनी बिहारमध्ये पदयात्रा काढली होती. संपूर्ण राज्यात त्यांनी प्रचार केला. मात्र, त्यांच्या पक्षाच्या एकाही उमेदवाराला आघाडी मिळालेली नाही. पहिल्या निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाचा सुपडा साफ होताना दिसत आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, प्रशांत किशोर यांनी अनेक मुलाखतींमध्ये दावा केला होता की जदयू २५ पेक्षा जास्त जागा जिंकणार नाही. जदयूने २५ पेक्षा जास्त जागा जिंकल्या तर मी राजकारण सोडेन, असं ते म्हणाले होते.



