सातारा शहर परिसरातील खराब रस्ते न सुधारल्यास आंदोलन -राहुल पवार
सातारा :सातारा शहरातील रस्त्यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जातो. मात्र चार सहा महिन्यात याच रस्त्यावर मोठमोठे खड्डे दिसून येत आहेत. निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांवर लोकप्रतिनिधी शांत का?ऐतिहासिक साताऱ्यात खड्डेच खड्डे चौहीकडे, अशा दशा झाली असून नगरपालिकेने याकडे दुर्लक्ष केले आहे. याविरोधात जनआंदोलन करणार असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष राहुल पवार सांगितले.
सातारा शहरातील शाहूनगर, गोडोली,सायन्स कॉलेज, पेंढारकर हॉस्पिटल,शाहूपुरी, तामजाईनगर , मल्हारपेठ, जगताप कॉलनी, चार भिंती , बुधवार नाका, आयटीआय या परिसरातील रस्त्यावर पडलेले खड्डे त्वरित मुजवावेत अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक आंदोलन तसेच रस्ता रोको आंदोलन करणार असल्याचे निवेदन सातारा नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना देऊन इशारा दिला आहे. खड्ड्यामध्ये सांडपाणी साचून वाहन चालकांना वाहन चालवणे कठीण झाले आहे. दुर्दैवी अपघात होण्याची शक्यता असून सध्या शाळा कॉलेज चालू असल्यामुळे विद्यार्थ्यांचीही मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे खड्ड्यात पाणी साचल्यामुळे मोठ्या प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव वाढवून डेंगू, मलेरियाचा प्रादुर्भाव पसरण्याचा धोका आहे. तरी या संबंधित विषयावर आपण समक्ष लक्ष घालून संबंधीत ठिकाणी रस्त्यावर पडलेले खड्डे त्वरित मुजविण्यात यावे. सातारा शहरातील प्रत्येक भागात डास प्रतिबंधक फवारणी करण्यात यावी. शहरातील खड्ड्यामुळे दुर्दैवी अपघात होऊन घटना घडल्यास या सर्वस्वी संबंधित नगरपालिकेचे प्रशासन जबाबदार असेल, याबाबतचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेना सातारा शहराध्यक्ष राहुल पवार यांनी अतिरिक्त मुख्याधिकारी दामले ,बांधकाम अधिकारी छिद्रे, स्वच्छता विभागाचे गणेश टोपे यांना निवेदन दिले आहे. निवेदनाची दखल न घेतल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना सातारा शहर पदाधिकारी आक्रमक आंदोलन आणि प्रमुख रस्ता रोको करणार असा इशारा निवेदन देताना दिला.यावेळी शहर उपाध्यक्ष भरत रावळ, अझहर शेख ,विभाग अध्यक्ष गणेश पवार, पदाधिकारी उपस्थित होते.
