कृष्णातीरची कामगिरी कृष्णाकाठाला भूषणावह
शानदार पुरस्कार वितरण सोहळ्यात हरिष पाटणे यांचे गौरवोद्गार
वाई : माझ्या मनात चव्हाण साहेबांच्या कृष्णाकाठचे जे महत्व आहे तेच कृष्णातीर बद्दल आहे. गेली २३ वर्ष अत्यंत परिश्रमाने सुरू असलेल्या कृष्णातीरची कामगिरी कृष्णाकाठाला भूषणावह आहे. अत्यंत योग्य व्यक्तींचा गौरव करून ते भूषण वाढले आहे, असे गौरवोद्गार पुणे विभागीय अधीस्विकृती समितीचे अध्यक्ष तथा सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे यांनी वाई येथे काढले.
वाई येथील कै. रमेश गरवारे सभगृहात पार पडलेल्या शानदार सोहळ्यात साप्ताहिक कृष्णातीरचा पुरस्कार वितरण आणि वर्धापनदिन साजरा झाला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते अ. भा. मराठी साहित्य महामंडळाचे विश्वस्त विनोद कुलकर्णी, टी अँड टी कंपनीचे चेअरमन उद्योजक शिवराम थोरवे, ज्येष्ठ पत्रकार भद्रेश भाटे, जयवंत पिसाळ यांना कृष्णातीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
तसेच लो टिळक स्मारक संस्थेचा आदर्श संस्था पुरस्कार पाटणे व कुलकर्णी यांचे हस्ते उपाध्यक्ष दत्ता मर्ढेकर, डॉ चिंतामणी केळकर, भद्रेश भाटे, शिवाजी कदम, अनुराधा कोल्हापुरे, ग्रंथपाल अमित वाडकर यांनी स्विकारला.
यावेळी बोलताना हरिष पाटणे म्हणाले, सद्यस्थितीत मोठमोठ्या वृत्तसमुहांपुढे मोठ्या अडचणी असताना कृष्णात घाडगे यांनी मात्र सातत्य राखून परिश्रमाने कृष्णातीर झेंडा फडकवत ठेवला आहे. कृष्णातीरचे अनेक जुने अंक माझ्या संग्रही आहेत. या वाटचालीत त्यांनी योग्य आणि आदर्श व्यक्तींचा पुरस्कार देऊन केलेला गौरव निश्चित कौतुकास्पद आहे. असे काम करणारे हे सारे जण माझे सहकारी आहेत याचा मला अभिमान असून त्यांच्या सहकार्याच्या बळावर आपण अधिअधिक चांगले काम करण्याचा प्रयत्न करत आहोत. तर्कतीर्थ लक्ष्मशास्त्री जोशी, आबासाहेब वीर, प्रतापराव भोसले यांनी राज्याचे तर लक्ष्मणराव पाटील यांनी जिल्ह्याचे नेतृत्व करून वाईचा लौकिक वाढवला. त्यात अनेकांनी भर टाकली. वाईला फार मोठी परंपरा असून त्या परंपरेचे पाईक होण्याची कामगिरी इथे होत असल्याचा आनंद आहे.
विनोद कुलकर्णी म्हणाले, की पत्रकारिता, सहकार क्षेत्रात काम करताना साहित्य क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन वाईमध्ये पुरस्कार देऊन सन्मान झाला ही माझ्यासाठी महत्वपूर्ण बाब आहे. तर्कतीर्थ लक्षणशास्त्री जोशी यांनी महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर साहित्य संस्कृती मंडळ, विश्वकोश अशा विविध माध्यमातून साहित्य संवर्धनाचा पाया रचला. त्यांच्या भूमीत हा पुरस्कार स्वीकारताना मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी सुरू असलेली चळवळ गतिमान करण्याचा निर्धार करत आहे. बा. सी. मर्ढेकर यांच्या घराचे नूतनीकरण करून त्याचे लोकार्पण केले याचा विशेष आनंद असून यापुढील काळात सातारा जिल्हा साहित्य क्षेत्रात अधिक उज्वल कामगिरी करेल यासाठीच्या प्रयत्नांना हा पुरस्कार बळ देईल.
यावेळी उद्योजक शिवराम थोरवे, लोकमान्य टिळक स्मारक संस्थेचे उपाध्यक्ष दत्ता मर्ढेकर, भद्रेश भाटे, जयवंत पिसाळ यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविकात कृष्णात घाडगे यांनी आजपर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेऊन कोणतेही शुल्क न आकारता अथवा देणगी न घेता हे पुरस्कार देत असून चांगले काम करणाऱ्यांना बळ मिळावे हा एकमेव उद्देश असल्याचे सांगितले.
यावेळी मधू नेने, सतीश कुलकर्णी, ॲड. प्रतापसिंह देशमुख, गजानन भोसले, विराज शिंदे, दीपक ननावरे, जयवंत पवार, विलास पिसाळ, अरुण आदलिंगे, यशराज भोसले, भुईंज ग्रामपंचायतीचे जेष्ठ सदस्य गजानन दादा भोसले,सुखदेव निकम,वाई तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विश्वास पवार, तुषार महामुलकर, डॅडी वाघ, जगन्नाथ दगडे, नितीन जगताप, पांडुरंग भिलारे, प्रकाश पवार आदी उपस्थित होते.
किरण घाडगे, राहुल तांबोळी, विलास साळुंखे, अशोक इथापे, पांडुरंग खरे, जितेंद्र वारागडे, विनोद भोसले, संजय माटे यांनी स्वागत केले. विठ्ठल माने यांनी सूत्रसंचालन केले.चरण गायकवाड यांनी आभार मानले.
———-
हरिष पाटणे यांचा दिलखुलासपणा
हरिष पाटणे यांनी आपल्या भाषणात सर्व पुरस्कार्थिंचा गौरव करताना त्यांची गुणवैशिष्ट्ये सांगितली. विनोद कुलकर्णी या सहकाऱ्याची एनर्जी थक्क करणारी आहे. ते व मी दोघेही वाईचे जावई असून एका जावयाचा दुसऱ्या जावयाच्या हस्ते हा गौरव होत असल्याचे सांगून शिवराम थोरवे हे कमी बोलतात पण कामाच्या माध्यमातून वाईचे, जिल्ह्याचे नाव मोठे केल्याचे सांगितले. लोकमान्य टिळक स्मारक संस्था ही केवळ वाईचे नाही तर महाराष्ट्राचे भूषण असल्याचे सांगून भद्रेश भाटे या गुणी पत्रकाराचा आम्ही वाई आधी खंडाळ्यात गौरव केल्याचे आवर्जून सांगितले. तर जयवंत पिसाळ पत्रकारितेत मलाही सिनियर असून तसेच सामाजिक क्षेत्रात ते सतत कार्यमग्न असतात त्यामुळे ते माझ्या टीममध्ये नसून मी त्यांच्या टीममध्ये आहे, असेही दिलखुलासपणे हरिष पाटणे यांनी सांगितले.
