जिल्ह्यात कॉपीमुक्त परिक्षा अभियान जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिल्या बारावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा
सातारा – सातारा जिल्ह्यात ५२ परीक्षा केंद्रांवर जवळपास ३३ हजार ५०० विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत. जिल्ह्यामध्ये ‘कॉपीमुक्त परीक्षा’ हे अभियान जिल्हा परिषद शिक्षण विभाग, त्याचबरोबर जिल्हा प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येत आहे. यश मिळवण्यासाठी विद्यार्थांनी कुठल्याही गैरप्रकाराचा आधार घेऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले.
जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले, कॉपीमुक्त परिक्षा अभियानासाठी प्रशासनाने संपूर्ण चोख व्यवस्था केलेली आहे. सर्व परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यासाठी परीक्षकांसह कक्षाबाहेर महसूल व पोलीस विभागाचे अधिकारी-कर्मचारी असणार आहेत. याचबरोबर ड्रोनसारख्या तंत्रज्ञानाचाही वापर करण्यात येणार आहे. परीक्षेला आपण बसत असताना विद्यार्थ्यांनी कुठल्याही दडपणाशिवाय, कुठल्याही ताणाशिवाय परीक्षेला सामोरे जावे. यामुळे निश्चितपणे यश मिळण्यामध्ये मदत होते. यश मिळवण्यासाठी कुठलाही शॉर्टकट असू शकत नाही, विद्यार्थांनी कुठल्याही गैरप्रकाराचा आधार घेऊ नये, असे आवाहन करुन बारावीच्या परिक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.



