वाहतूक नियम मोडल्यास परवाना रद्द
मुंबई :वारंवार वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्या वाहनचालकांना दणका देण्यासाठी केंद्र सरकारने तयारी सुरू केली आहे. वाहन परवान्यासाठी लवकरच श्रेणीबद्ध गुणाधारित पद्धत (ग्रेडेड पॉइंट्स-बेस्ड सिस्टीम) लागू करण्यात येणार असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. या नव्या नियमांनुसार, वारंवार वाहतूक नियम मोडल्यास चालकाचा परवाना निलंबित किंवा कायमचा रद्द केला जाणार आहे. यामुळे बेशिस्त चालकांना आळा बसून राज्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.
‘सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स’च्या (सियाम) ६६व्या वार्षिक संमेलनात बोलताना गडकरींनी या सर्व योजनेबद्दल सविस्तर माहिती दिली. त्यानुसार, वाहतूक नियमांचे उल्लंघन थेट परवान्याच्या नोंदींशी जोडले जाणार आहे.
या प्रस्तावित यंत्रणेमध्ये वाहतुकीचा नियम मोडल्याची नोंद होईल आणि परवान्यामधून ठराविक गुण वजा केले जातील. दंडाचे हे गुण एका विशिष्ट मर्यादेपलीकडे गेले तर विभागाला संबंधित चालकाचा परवाना निलंबित किंवा कायमस्वरुपी रद्द करण्याचाही अधिकार असणार आहे, अशी माहिती गडकरी यांनी दिली.
‘बीएस-४’ वाहनांसाठी नवीन प्रदूषण नियंत्रण उपकरण
‘बीएस-४’ वाहनांमधून होणारे घातक उत्सर्जन कमी करण्यासाठी गडकरी यांनी नव्या योजनेची घोषणा केली. सुमारे ४ ते ५ हजार रुपये किमतीचे नवीन उत्सर्जन नियंत्रण उपकरण विकसित करण्यात आले असून, त्याच्या चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. हे यंत्र जुन्या ‘बीएस-४’ वाहनात बसवल्यास त्यातील उत्सर्जन ‘बीएस-६’ वाहनांच्या पातळीइतके कमी होण्याची अपेक्षा आहे.




