मुख्यमंत्री ‘माझी शाळा सुंदर शाळा’ स्पर्धेत कासवंड शाळेला तृतीय क्रमांक
भिलार-कासवंड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने मुख्यमंत्री ‘माझी शाळा सुंदर शाळा’ या उपक्रमात तृतीय क्रमांक पटकावून गावाच्या शैक्षणिक प्रगतीत मानाचा शिरपेच रोवला आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल ग्रामपंचायत कासवंडचे सरपंच मा. जनार्दनजी चोरमले यांनी शाळेचे मुख्याध्यापक श्री.संजय कांबळे सर शिक्षक श्री.तानाजी नगरे सर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.सचिन चोरमले व सर्व सदस्यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले.
या स्पर्धेत शाळेच्या भौतिक सुविधा, स्वच्छता, हिरवाई, शैक्षणिक वातावरण, नाविन्यपूर्ण उपक्रम, विद्यार्थी सहभाग आणि समुदायाचा सहभाग या विविध निकषांवर मूल्यमापन करण्यात आले. कासवंड शाळेने स्वच्छ व आकर्षक शालेय परिसर, भिंतलेखन, वृक्षारोपण, शालेय बाग, ग्रंथालय विकास, शैक्षणिक उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी यांमुळे परीक्षकांची मने जिंकली.
अभिनंदनपर कार्यक्रमात बोलताना सरपंच जनार्दनजी चोरमले म्हणाले, “शाळेचा हा सन्मान संपूर्ण गावाचा अभिमान आहे. शिक्षकांचे नियोजन, विद्यार्थ्यांची मेहनत आणि पालक-ग्रामस्थांचा सहभाग यामुळे हे यश शक्य झाले. भविष्यातही शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामपंचायत सर्वतोपरी सहकार्य करेल.”
मुख्याध्यापकांनी यावेळी शाळेच्या यशामागील टीमवर्कचा उल्लेख करत शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समिती, पालक आणि ग्रामस्थांचे आभार मानले. तसेच पंचायत समिती महाबळेश्वरचे गटशिक्षणाधिकारी मा.श्री.रमेश गंबरे साहेब व भिलारचे केंद्रप्रमुख मा.श्री.संजय पारठे साहेब यांचे वेळोवेळी मिळालेल्या मार्गदर्शनाबद्दल आभार व्यक्त केले आहेत.विद्यार्थ्यांनीही विविध उपक्रमांतून सहभाग घेऊन शाळेची गुणवत्ता उंचावली असल्याचे त्यांनी नमूद केले.
या यशामुळे कासवंड गावात आनंदाचे वातावरण असून शाळेच्या पुढील प्रगतीसाठी नवे ध्येय निश्चित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री ‘माझी शाळा सुंदर शाळा’ उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण शाळांचा कायापालट शक्य असल्याचे हे यश अधोरेखित करते.



