जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत महिला वर्गाची मते ठरणार निर्णायक.
सातारा-. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये महिला वर्गाची मते ही पुरुष मतदार संख्या बरोबरच असल्याने येत्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीमध्ये महिला वर्गाचे मतदान हे निर्णायक ठरणार आहे.येत्या ७ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या निवडणुकीमध्ये महिला वर्गांना आकर्षित करण्यासाठी उमेदवारांची अक्षरशः धावाधाव सुरू आहे.जिल्ह्यात सर्वच पक्षांत उमेदवारी मिळवण्यासाठी मोठी चढाओढ पहायला मिळाली आहे. त्यामुळे यावेळची होणारी निवडणूक ही अटीतटीची होणार असल्याचे दिसून येत आहे.भाजपा-शिवसेना युती तर काँग्रेस राष्ट्रवादी(श.प. गट) शिवसेना (उ.बा.ठा. गट) यांच्यात होणारा सामना त्यांच्याबरोबरच अपक्ष व बंडखोराचे मोठे आव्हान या निवडणुकीत उभे राहिले आहे.मतदारांपर्यंत आपले विचार पोहोचण्यासाठी उमेदवारांची मोठी तारांबळ उडत आहे.पुरुष मतदारा प्रमाणे महिला वर्ग ही यामध्ये मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्याने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या रिंगणात आता खऱ्या अर्थाने रंगत आली आहे.गाव पातळीवर व वाडी वस्तीपर्यंत प्रचाराची राळ उठली असून उमेदवार प्रत्यक्ष मतदारांपर्यंत पोहोचण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहे. या निवडणुकीत महिला वर्गाचे मतदान हे गेमचेंजर ठरणार असल्याचे संकेत आता मिळत आहे. उमेदवार लाडक्या बहिणीला आकर्षित करण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब करीत असल्याचे दिसून येत आहे.सन २०२४ च्या झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारत युतीचे राज्यात पानिपत केले होते.परंतु सहा महिन्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत युतीने महाविकास आघाडीला धूळ चारत एक हाती सत्ता ताब्यात घेतली अर्थात यासाठी युती सरकारने लाडकी बहिण योजनेची केलेली प्रभावी अंमलबजावणी हीच सत्तेसाठी निर्णायक ठरली.लाडक्या बहिणीला दरमहा मिळणारे पंधराशे रुपये ही सरकारने महिलांप्रती केलेला सन्मान आहे तर विरोधी पक्षांकडून याचे खंडन करताना लाडकी बहिण योजनेमुळे राज्याची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटलेली असून त्याचा विकास कामावर दुष्परिणाम झाला आहे. त्याचप्रमाणे राज्यातील ठेकेदारांची बिले ही मिळत नसल्याने विकास कामे पूर्णपणे कोलमडलेली आहेत असा प्रचार ते करीत आहेत. सातारा जिल्ह्याच्या मतदान यादीमध्ये पुरुषांच्या बरोबरीनेच महिलावर्गांची मतदानाची संख्या असल्याने जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत महिला वर्गांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.जिल्ह्यात महिला वर्गांची संख्या जवळपास दहा लाख ८६ हजार इतकी असून पुरुष वर्गाची संख्या ११ लाखाच्या घरात आहे.त्यामुळे होणाऱ्या निवडणुकीमध्ये महिला मतदारांची भूमिका ही निर्णायक ठरणार असल्याचे दिसून येत आहे.
मागील निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी पाहता पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या लक्षणीय असल्याचे दिसून आले आहे. त्यातच लाडकी बहीण योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण तसेच एस.टी. महामंडळाच्या प्रवास बिलामध्ये ५० टक्के सूट या शासनाच्या योजनांमुळे महिला वर्गांमध्ये विशेष उत्साह दिसून येत आहे.त्यामुळे होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये महिला वर्गांचा उत्स्फूर्त सहभाग हा राहणार आहे. त्यामुळे होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत महिला वर्गांचे मतदान हे निर्णायक ठरणार आहे.

श्रीरंग काटेकर, सातारा



