‘यशोदा इन्स्टिट्यूटस’ मध्ये ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ विविध उपक्रमांतून उत्साहात साजरा
सातारा (प्रतिनिधी)यशोदा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स, सातारा येथे वाचन संकल्प महाराष्ट्राचा दिन विविध शैक्षणिक व सर्जनशील उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे, विचारशीलता वाढवणे आणि डिजिटल युगातही पुस्तकांशी नाते दृढ ठेवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
या कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. अजिंक्य सगरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “वाचन ही केवळ सवय नसून व्यक्तिमत्त्व घडविण्याची प्रक्रिया आहे. सातत्यपूर्ण वाचनामुळे विचारांची खोली वाढते, अभिव्यक्ती समृद्ध होते आणि समाजाकडे पाहण्याची दृष्टी व्यापक बनते.” त्यांनी विद्यार्थ्यांनी दररोज काही वेळ वाचनासाठी राखून ठेवण्याचे आवाहन केले.
या दिनानिमित्त पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी वाचनाचे महत्त्व, मराठी साहित्याची समृद्ध परंपरा, ग्रंथसंस्कृती आणि आधुनिक काळातील वाचनाचे स्वरूप या विषयांवर प्रभावी पोस्टर्स सादर केले. मिम्स स्पर्धा ही विशेष आकर्षण ठरली. तरुणाईच्या भाषेत वाचनाचे महत्त्व मांडणाऱ्या सर्जनशील व विचारप्रवर्तक मिम्सना उपस्थितांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला.
यासोबतच कोट्स स्पर्धा घेण्यात आली. प्रसिद्ध लेखक, कवी, विचारवंत तसेच विद्यार्थ्यांनी स्वतः रचलेले वाचनप्रेरित विचार सादर केले. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांची भाषिक अभिव्यक्ती व सर्जनशीलता अधिक खुलली.
कार्यक्रमाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून पुस्तक दान उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांनी, प्राध्यापकांनी आणि कर्मचाऱ्यांनी उपयुक्त शैक्षणिक, साहित्यिक व प्रेरणादायी पुस्तके दान केली. ही पुस्तके गरजू विद्यार्थ्यांपर्यंत व वाचनालयांपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
या उपक्रमास संस्थेचे प्राचार्य, विभागप्रमुख, ग्रंथपाल, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. वाचन संकल्प महाराष्ट्राचा दिन साजरा करताना यशोदा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सने वाचनसंस्कृती जपण्याचा आणि पुढील पिढीला ज्ञानमार्गावर प्रेरित करण्याचा आपला सामाजिक व शैक्षणिक वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.
“वाचन ही केवळ शैक्षणिक गरज नसून ती विचारशील आणि संवेदनशील समाज घडविण्याची शक्ती आहे.
डिजिटल माध्यमांच्या गदारोळातही पुस्तकांशी नाते जपणे आज अधिक गरजेचे झाले आहे.वाचनामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, मूल्यविचार आणि सर्जनशीलता विकसित होते.यशोदा समूह वाचनसंस्कृती जपण्यासाठी सातत्याने असे उपक्रम राबवत राहील.तरुण पिढीने वाचनाला जीवनाचा अविभाज्य भाग बनवावा.”
अजिंक्य सगरे (उपाध्यक्ष, यशोदा ग्रुप ऑफ इन्स्टि ट्यूट्स)




