राज्यात आजपासून निवडणुकीची रणधुमाळी; नगरपालिका, नगरपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज दाखल प्रक्रिया सुरू
मुंबई-राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला आजपासून (10 नोव्हेंबर) सुरुवात होणार आहे. यासाठी आठ दिवसांची मुदत देण्यात आली असून 17 नोव्हेंबर हा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असेल. नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी राज्यभरात सर्वच पक्षांकडून उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात झाली आहे. मात्र अनेक भागात महायुती की महाविकास आघाडी म्हणून निवडणुका लढवणार हे अद्याप स्पष्ट नाही. 17 नोव्हेंबरही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. 2 डिसेंबरला मतदान आणि 3 डिसेंबरला निकाल आहे.
राज्यातील 247 नगरपरिषदा आणि 147 नगर पंचायतींच्या नगराध्यक्ष पदांची आरक्षण सोडत नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी नगर विकास विभागांचे अपर मुख्य सचिव डॉ. के. एच. गोविंदराज, उपसचिव प्रियांका कुलकर्णी, छापवाले, उपसचिव विद्या हम्पय्या, अनिरुद्ध जेवळीकर, यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. राज्यातील 247 नगरपरिषदेपैकी 33 पदे अनुसूचित जातींसाठी व 11 पदे अनुसूचित जमातीसाठी आणि 67 पदे नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाली आहेत. तर 136 पदे खुल्या प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आली आहेत.




