अतिवृष्टीग्रस्त विद्यार्थ्यांची फी माफ करावी युवा नेतृत्व राहुल पवार यांच्या नेतृत्वात सातारा मनसेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले निवेदन
सातारा प्रतिनिधी-राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली असून शेतीचे व घरांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करण्याची मागणी करण्यात आली आहे.
मनसेचे राहुल पवार यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झाले असून अनेकांची पिके जमीनदोस्त झाली आहेत. त्यामुळे शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय, अभियांत्रिकी, विधी इत्यादी शाखांची फी भरणे अशक्य झाले आहे.
म्हणून शासनाने सर्व विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करावी, तसेच शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीसाठी हेक्टरी रु. ५०,०००/- इतके अनुदान देण्यात यावे, अशी मागणी मनसेने केली आहे.शासनाने याबाबत त्वरीत कार्यवाही केली नाही, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने जनहितासाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.
