शिवरायांचे 12 किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत
महाराष्ट्रातील 11 किल्ले आणि तामिळनाडूतील जिंजी अशा 12 किल्ल्यांचा जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे.महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या संग्रामाचे साक्षीदार आणि मराठ्यांच्या धैर्य, शौर्य, त्याग, पराक्रमाचा वारसा लाभलेले राज्यातील रायगड, राजगड, प्रतापगड, लोहगड, शिवनेरी, पन्हाळा, साल्हेर, खांदेरी, सुवर्णदुर्ग, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग तसंच तामिळनाडूतील जिंजी या बारा किल्ल्यांचा समावेश युनेस्को जागतिक वारसा नामांकन यादीत झाला.राज्याला हे यश मिळवून देण्यात प्रधानमंत्री मा.श्री. नरेंद्र मोदी आणि केंद्रसरकाची भूमिका, त्यांचं सहकार्य महत्वाचं ठरलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत ट्वीट करताना म्हटले की, ‘महाराष्ट्रातील सर्व नागरिकांचे, शिवप्रेमींचे मन:पूर्वक अभिनंदन…, मला हे सांगताना अतिशय आनंद होतो की, संपूर्ण देशवासियांचे आराध्यदैवत, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे किल्लेवैभव असलेले 12 किल्ले हे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाले आहेत.
