आत्मविश्वासाच्या बळावर ध्येयाला गवसणी घाला ..
इतिहास अभ्यासक दशरथ ननावरे यांचा विश्वास, कौशल्य क्लासेसचा शुभचिंतन समारंभ
खंडाळा : मुलांनी विद्यार्थीदशेतच ध्येय निश्चित केले पाहिजे. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी उत्तुंग ध्येय समोर ठेवले पाहिजे. जिद्द , चिकाटी आणि प्रयत्नातील सातत्य कायम ठेवून त्या ध्येयाचा पाठलाग करायला हवा. जीवनात हमखास यश मिळवायचे असेल तर आत्मविश्वास हवा. आत्मविश्वासाच्या बळावर ध्येयाला गवसणी घालता येते असा विश्वास प्रेरणादायी वक्ते , इतिहास अभ्यासक दशरथ ननावरे यांनी व्यक्त केला.
खंडाळा येथील कौशल्य क्लासेसच्या वतीन आयोजित दहावी विद्यार्थी शुभचिंतन समारंभ प्रसंगी ‘ शालेय जीवन आणि यशाचा मार्ग ‘ या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी संस्थेचे संचालक सागर घाडगे , सागर भोसले यासह प्रमुख उपस्थित होते.
इतिहास अभ्यासक दशरथ ननावरे म्हणाले , छत्रपती शिवाजी महाराजांनी नियोजनाच्या बळावर स्वराज्य उभे केले. संकटातून मार्ग काढण्यासाठी योजना आखल्या त्यामुळे यश मिळाले. कोणत्याही कामाचे योग्य नियोजन तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जाते. शालेय वयात अभ्यासातील सातत्य ठेवून प्रत्येक विषयाच्या मूळाशी पोहचून आकलनपूर्वक अभ्यास केला तर अपयशाला सामोरे जावे लागणार नाही. जीवनात यश प्राप्त करण्यासाठी योग्य नियोजन व कामाची वेळेत सुरुवात करायला हवी. जीवनात संकट ही कधीच अडवायला येत नाहीत तर ती आपणाला घडवायला येतात. संकट कितीही मोठे असूद्या मनातील भीती बाजूला सारून संकटांवर स्वार व्हायला शिका. पुढे जाण्यासाठी संकटांना संधी मानून काम केले तर तुम्ही यशाच्या शिखरावर निश्चित पोहचाल. आपल्यातील कमतरतांचे कारण पुढे करून अडून बसू नका त्यांना बलस्थाने बनवा तुमचा यशाचा मार्ग मोकळा होईल. तुमच्या ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
