संत तुकारामांचे वैज्ञानिक गाथा दोहन ग्रंथांचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.
सातारा -वृक्षवल्ली आम्हा सोयरे या अभंग गायनाने मंगलमय वातावरणात समारंभाची सुरवात झाली.लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयाच्या सभागृहात वाचस्पती प्राचार्य डॉक्टर यशवंत पाटणे, प्राचार्य डॉक्टर राजेंद्र शेजवळ आणि कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू प्राचार्य डॉक्टर ज्ञानदेव मस्के यांच्या शुभहस्ते ग्रंथांचे प्रकाशन पार पडले. याप्रसंगी डॉ.यशवंत पाटणे सरांनी ग्रंथाचे अंतरंग उघडून सांगितले. ते म्हणाले “धर्म हे अंतरंगाचे विज्ञान आहे तर विज्ञान हा सृष्टीचा धर्म आहे .परमेश्वर चराचरात आहे. तसा तो अंतर्यामी आहे. हे अंतिम सत्य संत तुकाराम सांगतात. हीच विज्ञान आणि धर्माची परस्परपूरक आणि प्रेरक भूमिका डॉक्टर बेंद्रे यांनी या ग्रंथात विशद केली आहे. हा ग्रंथ मनाला चेतना देणारा सुविचारांचा अमृतकुंभ आहे”
डॉ. राजेंद्र शेजवळ यांनी पूर्ण ग्रंथांचे जणू रसग्रहणच केले. आपल्या ओघवती रसाळ वाणीने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के सरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणाने या समारंभाचा कळसाध्याय गाठला. नर्म विनोदी शैलीत त्यांनी वेद ,उपनिषदे ,दर्शन शास्त्रे यातील गूढार्थातील सत्य विशद केले. या शास्त्रांचा संत तुकारामांनी आपल्या गाथेत केलेल्या प्रयोजनाचा अत्यंत सोप्या भाषेत उलगडा केला. तिनही दिग्गज वक्त्यांनी त्यांच्या अमृतवाणीने उपस्थितांना अभूतपूर्व मेजवानी दिली .याप्रसंगी एल.बी.एस्. चे विद्यमान प्राचार्य डॉक्टर मोहिते सर, प्राचार्य महेश गायकवाड सर ,प्राचार्य सुहास साळुंखे हे आवर्जून उपस्थित होते.
प्रारंभी डॉ सुधाकर बेंद्रे यांनी प्रास्ताविक केले. ग्रंथ लिखाणा मागील भूमिका विशद केली.डॉ.रूपाली बेंद्रे यांनी आभार मानले. आपल्या अभ्यासपूर्ण रसाळ वाणीतील सूत्र संचालनाने श्री. सुजित शेख यांनी अधिकच रंगत आणली.विविध क्षेत्रातील मान्यवर, नातेवाईक, विविध संघटनांचे पदाधिकारी,मोठ्या संख्येने उपस्थित होते. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
