सन्मानाने जगण्याचा हक्क डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिला-प्रा विक्रम कदम
तांबवे –“प्रतिकूल परिस्थितीत अत्यंत मेहनतीने व चिकाटीने शिक्षण घेऊन आपल्या ज्ञानाचा उपयोग डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भारतासारख्या खंडप्राय देशाचे परिपूर्ण संविधान लिहिण्यासाठी केला.प्रत्येक भारतीयाला संविधानाच्या माध्यमातून मूलभूत हक्क-अधिकार प्रदान करून त्यांना सन्मानाने जगण्याचा हक्क डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी प्राप्त करून दिला.बाबासाहेबांनी केलेले कार्य केवळ एका विशिष्ट समाजापुरते मर्यादित नसून ते संपूर्ण भारतीयांसाठी आहे.”असे प्रतिपादन इतिहास अभ्यासक व सुप्रसिद्ध वक्ते प्रा. विक्रम कदम यांनी केले. कोपर्डे हवेली ता कराड भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त कोपर्डे हवेली ता कराड,येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती,समता सामाजिक विकास संस्था व भीमराज प्रतिष्ठान आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सह्याद्री बॅकेचे संचालक सागर पाटील होते.यावेळी भाजपचे राज्याचे उपाध्यक्ष विक्रम पावसकर ,पत्रकार दीपक पवार, किशोर जाधव, गजानन देशमाने, माजी सरपंच बाळूताई सरगडे, सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक नेताजी चव्हाण, ग्रामपंचायतचे सदस्य अमित पाटील तसेच कोपर्डे ग्रामस्थ कार्यक्रमाला उपस्थित होते.
प्रा.विक्रम कदम म्हणाले डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणासाठी सुभेदार रामजी आंबेडकरांनी खूप मोठा त्याग केला.पुढे डॉ बाबासाहेब जगातल्या अनेक विद्यापीठांमध्ये जाऊन उच्चशिक्षित झाले. तसेच त्यांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग केवळ स्वतःसाठी नाही तर समाजाच्या उद्धारासाठी केला.शिक्षण हीच आजच्या काळातील संपत्ती असून उत्तम शिक्षण देऊन आपल्या मुला मुलींना घडवणे हीच आजच्या काळाची गरज आहे.दर्जेदार शिक्षणानेच आपल्या समाजाची प्रगती होईल.जगाच्या स्पर्धेत टिकायचा असेल तर दर्जेदार शिक्षणाशिवाय पर्याय नाही.आज शिक्षणाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत उपलब्ध संधीच सोनं करून जागतिक पटलावरती आपल्या समाजातील तरुणांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवून हीच बाबासाहेबांना खरी आदरांजली ठरेल.”असेही ते म्हणाले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक, स्वागत दिगंबर सरगडे यांनी केले.
