अनुवादकाने लेखकाची शैली आत्मसात करावी ज्येष्ठ लेखिका अनुवादक डॉक्टर उमा कुलकर्णी यांचे मत
सातारा- साहित्य क्षेत्रामध्ये भाषांतर, रूपांतर आणि अनुवाद हे तीन संपूर्णपणे वेगळे विषय आहेत. अनुवाद करत असताना अनुवादकाने मुळ लेखकाची शैली आणि विचार वाचकांपर्यंत पोहोचवणे अत्यंत महत्त्वाचे आहे असे मत जेष्ठ लेखिका व अनुवादक डॉक्टर उमा कुलकर्णी यांनी व्यक्त केले
सातारा येथे होणाऱ्या 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाहूपुरी शाखा आम्ही पुस्तक प्रेमी ग्रुप,मावळा फौंडेशन आणि दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे डॉक्टर उमा कुलकर्णी यांचा अमृत महोत्सवी सत्कार आणि प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम करण्यात आला होता त्यावेळी त्या बोलत होत्या
डॉक्टर संदीप श्रोत्री आणि विनोद कुलकर्णी यांनी यावेळी डॉक्टर उमा कुलकर्णी यांच्याशी संवाद साधला
डॉ.उमा कुलकर्णी यांनी कन्नड साहित्यातील भैरप्पा,शिवराम कारथ,अनंतमूर्ती अशा अनेक ज्येष्ठ लेखकांच्या साहित्यकृती मराठीमध्ये अनुवादित करून मराठी वाचकांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत त्यांच्या या कार्याबद्दल छेडले असता त्या म्हणाल्या,अनुवाद ही एक विचारपूर्वक करण्याची गोष्ट आहे.मूळ लेखकांनी आपल्या साहित्यकृतीमध्ये जी संस्कृती दाखवली आहे ती तशीच्या तशी अनुवादित साहित्यामध्ये आणली तरच तो विषय वाचकांपर्यंत पोहोचतो.अशी संस्कृती ज्या साहित्यकृतींच्या अनुवादातून येऊ शकत नाही अशा साहित्य कृतींचा अनुवाद करण्याची गरज नाही.
कन्नड साहित्यकृती मराठीत अनुवादित करण्याच्या या मोहिमेमध्ये आपले पती विरुपाक्ष कुलकर्णी यांचे मोठे योगदान लाभले मी कन्नड भाषेतील पुस्तके वाचत नसतानाही केवळ पति विरूपाक्ष कुलकर्णी यांच्या सहकार्यामुळेच अनेक ज्येष्ठ लेखकांच्या मोठ्या कन्नड साहित्य कृती मी मराठीत आणू शकले असे त्यांनी सांगितले
डॉ उमा कुलकर्णी यांनी यावेळी भैरप्पा, शिवराम कारंथ, डॉक्टर सुधा मूर्ती अशा अनेक ज्येष्ठ लेखकांबरोबर सहवासाच्या त्यांच्या आठवणींचा उलगडा केला.
आधुनिक काळामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून जरी अनुवाद केले जात असले तरी त्यामध्ये लेखकाचा आत्मा आणणे अत्यंत अवघड आहे त्यामुळे मला तरी हे तंत्रज्ञान अनुवादाला आव्हान देऊ शकते असे वाटत नाही असेही त्यांनी सांगितले.
यावेळी सर्व संयोजक संस्थांच्या वतीने डॉ उमा कुलकर्णी यांना मानपत्र प्रदान करण्यात आले या मानपत्राचे वाचन ज्येष्ठ पत्रकार मुकुंद फडके यांनी केले. दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन शिरीष चिटणीस यांनी प्रास्ताविक केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदकुमार सावंत यांनी केले
आभार प्रदर्शन ऍड सीमंतिनी नुलकर यांनी केले कार्यक्रमाला साताऱ्यातील विविध साहित्य रसिक, लेखक उपस्थित होते. त्यामध्ये श्रीमती काकडे, श्रीकांत वारुंजीकर, डॉ शाम बडवे, पद्माकर पाठकजी, अभयसिंग शिंदे, वैभव ढमाळ, राजकुमार निकम, वडूजच्या शुभदा कुलकर्णी, अदिती काळमेख, अनिल जठार, काका पाटील, गौतम भोसले, स्वाती राउत , डॉ राजेंद्र माने, प्रकाश शिंदे, सविता शिंदे, राजश्री शहा, वैदेही कुलकर्णी, रागिणी जोशी, प्रतिभा वाडीकर, गौरी वैद्य, अजित साळुंखे आदी अनेक मान्यवर साहित्य रसिक आणि मान्यवर उपस्थित होते.
