वडूजला मतदान जागृतीसाठी नवमतदारांशी वैयक्तिक संवाद
सातारा :मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून प्रशासनातर्फे सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. विविध स्पर्धा, विविध व्याख्याने आणि उपक्रम विविध विभागांतर्फे राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जे यावर्षी प्रथमच मतदान करणार आहेत, अशा नवमतदार तरुणांशी वैयक्तिक संपर्क साधून त्यांना लोकशाही आणि मतदानाचे महत्त्व समजावून सांगण्यात येत आहे, अशी माहिती संविधान, विस्तार अधिकारी यशेंद्र क्षीरसागर यांनी दिली.
७ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी निवडणूक होत आहे. मतदानाची टक्केवारी वाढणे किंबहुना शंभर टक्के मतदान होणे हे सुदृढ आणि बळकट लोकशाहीसाठी अत्यावश्यक आहे. तो राज्यघटनेचा आणि लोकशाहीचा सन्मान आहे. उज्ज्वल भारताच्या भवितव्यासाठी जास्तीत जास्त मतदान आवश्यक आहे. नव्यानेच मतदान करणारे नवमतदार हा भारतीय लोकशाहीचा भावी आधारस्तंभ आहे, हे ओळखून त्यांच्याशी संवाद साधला जात आहे.
आपण मतदानासाठी उत्सुक आहात का, लोकशाहीचे महत्त्व काय, मतदान करण्याचे महत्त्व काय अशा सर्व अंगानी नवमतदार तरुण-तरुणींशी संवाद साधून त्यांच्या मनामध्ये लोकशाही आणि मतदानाविषयीची जागरूकता निर्माण केली जात आहे. ‘प्रत्येक मत लाखमोलाचे आहे’ ही भावना त्यांच्या मनात रुजविल्यास हा भावी मतदार भारताचे उज्ज्वल भवितव्य घडवेल. या अभिनव उपक्रमासाठी उपविभागीय अधिकारी उज्ज्वला गाडेकर, गटविकास अधिकारी योगेश कदम यांनी प्रोत्साहन दिले.
शिरसवडी येथील नवमतदार आनंदा इंगळे यांनी सांगितले की, मतदान हा आपला अधिकार आहे. चांगल्या व्यक्ती निवडून आल्या पाहिजेत. माझ्या एका मताने काय होणार असा संकुचित विचार आपण करू नये. तर उत्साहाने मतदान करावे.



