मराठी भाषा गौरवदिनी सातारा जिल्ह्यातील साहित्यिकांचा सन्मान
छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये विविध प्रातिभ स्पर्धांचे आयोजन
सातारा: येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या भाषा मंडळ व घटक महाविद्यालय छत्रपती शिवाजी कॉलेजचा मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने २७ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी कॉलेजच्या बॅरिस्टर पी.जी पाटील सभागृहात ‘मराठी भाषा गौरव दिन’ समारंभाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या समारंभात मान्यवर लेखकाचे व्याख्यान आयोजित केले असून मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या अग्रणी व घटक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला व भाषिक कौशल्याचा आविष्कार करण्यास संधी मिळण्यासाठी मराठी वक्तृत्व,रांगोळी,कविता रसग्रहण,पुस्तक परीक्षण,निबंध इत्यादी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय व छत्रपती शिवाजी कॉलेजचे विद्यार्थी सहभागी होतील. या स्पर्धेत प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवून विजेत्या ठरलेल्या विद्यार्थ्यांना कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.ज्ञानदेव म्हस्के, रयत शिक्षण संस्थेचे ऑडीट विभागाचे सहसचिव प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे,विद्यापीठाचे पदाधिकारी,प्रमुख अतिथी वक्ते यांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून भाषा मंडळ व मराठी विभागाने सातारा जिल्ह्यातील साहित्यिक यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्याचे ठरविलेले आहे.तरी जे या समारंभास उपस्थित राहणार आहेत,अशा लेखक ,कवी यांनी भाषा मंडळाचे प्रभारी संचालक,मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.सुभाष वाघमारे मोबाईल नंबर ९८ ९० ७२ ६४ ४० यांचेकडे आपली नावे नोंदवावीत. तसेच आपल्या प्रकाशित ग्रंथ ,कलाकृती यांची माहिती लेखी स्वरुपात द्यावी तसेच प्रकाशित ग्रंथ छत्रपती शिवाजी कॉलेजच्या मराठी विभागात देण्यात यावे. मराठी भाषेतून ज्यांनी साहित्य ग्रंथ प्रकाशित केले त्याची नोंद मराठी विभागात ठेवली जाणार आहे. हे ग्रंथ विद्यार्थी व अभ्यासक यांना हे ग्रंथ उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे नोंदणी केलेल्या साहित्यिक यांनाच मराठी भाषा गौरव दिन समारंभात प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान केला जाईल. भाषा मंडळ व मराठी विभाग यांनी मराठी भाषा संवर्धन करण्यासाठी कोणकोणते उपक्रम व कार्यक्रम घ्यावेत यासाठी या साहित्यिकानी आपल्या सूचना लेखी स्वरुपात मराठी विभागात द्याव्यात असे आवाहन करण्यात आलेले आहे.
