मतदार यादीत घ्यायचे शहाणपण अगोदर का सुचले नाही-संग्राम घोरपडे
कराड –साखर सहसंचालकांनी निर्देश दिल्यानंतर आता ‘सह्याद्री’चे शेअर्स रक्कम अपूर्ण असलेले ते २ हजार २२१ सभासद आपलेच असल्याचा साक्षात्कार विद्यमान अध्यक्षांना झाला आहे. आम्ही त्यांना मतदार यादीत सामावून घेणार आहोत अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. पण हे शहाणपण त्यांना अगोदर का सुचले नाही?असा सवाल संग्राम घोरपडे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केला आहे.
जर आपण रक्कम अपुर्ण असलेले शेअर्स आज कायदेशीर होते म्हणता तर आपण हे सभासद पुर्वीच मतदार यादीमध्ये समाविष्ट करणे अपेक्षित होते. म्हणजे कायदा बाजूला ठेवून आपण या सभासदांना मतदानापासून वंचित ठेवण्याच्या हेतूनेच यांची नावे प्रारुप मतदार यादीतून बाजूला ठेवली का? यासाठी कोणी लढा दिला हे सभासदांना चांगले माहिती आहे. निर्णय झाल्यावर त्यांचे हे बोलणे आहे हे सगळे जाणतात असेही त्यांनी म्हटले आहे.
पत्रकात म्हटले आहे की, गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून सभासदांच्या अनेक वारसदारांनी सभासद करण्यासाठी परिपूर्ण प्रस्ताव कारखान्याकडे दिले आहेत. तरीही त्यांना सभासद करून घेतले नाही ही वस्तुस्थिती आहे. मात्र आपण गेल्या आठ वर्षात एवढया वारसांना सभासद करून घेतले अशी आकडेवारी दिलीत तर मग उरलेल्या वारसांना आपण सभासद का करुन घेतले नाहीत. फक्त आपल्या सोयीच्या वाटणाऱ्या लोकांनाच तुम्ही सभासद करुन घेतले आहे. परंतु ते सभासदसुध्दा सह्याद्रीच्या हितासाठी आमच्या बरोबरच राहतील.
मग सुपुत्र सभासद कधी झाला?
गत पंचवीस वर्षात कारखान्यात एकही नवा सभासद केला नाही असे विद्यमान अध्यक्ष जाहीर सभांमधून सांगत आहेत. पण त्यांनी त्यांच्या सुपुत्राला कधी व कसे कारखान्याचे सभासद केले हे त्यांनी स्पष्ट करावे असे आवाहनही घोरपडे यांनी केले आहे.
अगोदर समाविष्ट का केले नाहीत?
काही शेतकऱ्यांनी सभासदत्वासाठी दाद मागितली. आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या सहकार्यातून या सभासदांना न्याय मिळाला. साखर सहसंचालकांनी त्यांना न्याय दिला. पण हेच शेतकरी तेथे गेले नसते, साखर सहसंचालकांचा निर्णय विरोधात गेला असता तर तुम्ही हातावर हात बांधूनच बसला असता ना? तुम्हाला जर हे शेतकरी आपलेच आहेत असे वाटत होते तर त्यांची नावे प्रारुप मतदार यादीत तुम्ही अगोदरच समाविष्ट केली असती. यातच आपला हेतू दिसून येतो असेही घोरपडे यांनी म्हटले आहे.
