देशभरात स्वातंत्र्यदिनाचा उत्साह; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण
नवीदिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 79 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर आज लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले. यावेळी लाल किल्ल्यावरुन नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना 140 कोटी भारतीयांचा ऊर अभिमानानं भरुन आल्याचं सांगितलं. तसेच ऑपरेशन सिंदूरबाबतही नरेंद्र मोदींनी भाष्य केलं. स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना आदरांजली वाहिली.
पहलगाममध्ये सीमेपलीकडून आलेल्या दहशतवाद्यांचा संहार करण्यात आला. पहलगाममध्ये धर्म विचारुन मारले गेले. त्यानंतर ऑपरेशन सिंदूर देशाच्या संतापाची अभिव्यक्ती होती. सेनादलाला आम्ही पूर्ण मुभा दिली होती. लक्ष्य आणि कारवाई त्यांनीच निश्चित केली, असं नरेंद्र मोदी म्हणाले. पाकिस्तान उद्धव्स्त झाल्यासंबंधी रोज नवनवी माहिती येतेय. पाकिस्तानचं प्रचंड नुकसान झालंय, असंही नरेंद्र मोदींनी सांगितले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, हा उत्सव देशाच्या एकतेची भावना सतत बळकट करत आहे. तिरंगा भारताच्या प्रत्येक घरात आहे, मग तो वाळवंटापासून हिमालयापर्यंत असो, समुद्रकिनारा असो किंवा दाट लोकवस्तीचा भाग असो. आज आपल्याला लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून ऑपरेशन सिंदूरच्या शूर सैनिकांना सलाम करण्याची संधी मिळाली आहे. आपल्या शूर सैनिकांनी शत्रूंना त्यांच्या कल्पनेपलीकडे शिक्षा दिली आहे. अण्वस्त्रांच्या धमक्यांना आम्ही आता भीक घालत नाही, असा इशारा देखील नरेंद्र मोदींनी दिला. सिंधू पाणीवाटप करार अन्यायकारक होता, हे देशाला समजलंय, असंही नरेंद्र मोदींनी सांगितले.





