Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » साहित्यिक ग्रंथसंपदा » छत्रपती शाहू बोर्डिंगसाठी लोकनेते रामशेठ ठाकुरांची ५० लाख रुपयांची देणगी जाहीर

छत्रपती शाहू बोर्डिंगसाठी लोकनेते रामशेठ ठाकुरांची ५० लाख रुपयांची देणगी जाहीर 

धनिणीची बाग ही ‘रयत’ची पंढरी: लोकनेते रामशेठ ठाकूर

रयत माऊली सौ. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांची ९५ वी पुण्यतिथी साजरी 

छत्रपती शाहू बोर्डिंगसाठी लोकनेते रामशेठ ठाकुरांची ५० लाख रुपयांची देणगी जाहीर 

सातारा, ता. २९”डॉ. अनिल पाटील यांनी बोर्डिंगला नवे रुप दिले आहे. शाहू बोर्डिंगमधील शिस्त, नीटनेटकापणा जगाने शिकण्यासारखा आहे. डॉ. अनिल पाटील यांच्या प्रयत्नातून धनिणीच्या बागेत डिजिटल चलचित्राच्या स्वरूपात कर्मवीर अण्णांचे चरित्र रेखाटले आहे. यातून अनेकांना रयत शिक्षण संस्थेचा इतिहास माहीत होणार आहे. ज्याप्रमाणे वारकऱ्यांना पंढरीत गेल्यावर आनंद होतो, तोच आनंद आम्हाला धनिणीच्या बागेत आल्यावर होतो. त्यामुळे धनिणीची बाग ही रयत शिक्षण संस्थेची पंढरी आहे”, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे ज्येष्ठ सदस्य, थोर देणगीदार, लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले. रयत माऊली सौ. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या ९५ व्या पुण्यतिथी समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन मा. चंद्रकांत दळवी IAS (Retd.) हे होते. यावेळी कर्मवीर अण्णा, लक्ष्मी वहिनी यांच्या वसतिगृहातील प्रसंगावर आधारित रेखाटलेल्या म्युरल शिल्पाचे मा. रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. यावेळी रामशेठ ठाकूर यांनी शाहू बोर्डिंगसाठी ५० लाख रुपयांची देणगी जाहीर केली 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रयत शिक्षण संस्थेचे संघटक डॉ. अनिल पाटील यांनी केले. यावेळी बोलताना ते म्हणाले, “वहिनींना अवघ्या ३६ वर्षांचे आयुष्य लाभले. अंगावरील सर्व दागिने वसतिगृहातील मुलांच्यासाठी खर्च केले. शेवटचा दागिना मंगळसूत्र, तोही विकून टाकला. वहिनींच्या या त्यागावरच रयत शिक्षण संस्था उभी आहे. वहिनींना जे दागिने केले जायचे ते त्यांचा भाऊ कलगोंडा पाटील करत होते. त्यांनी केलेल्या दागिन्यांचा उपयोग अण्णांनी संस्थेसाठी केला. सध्या या बोर्डिंगमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले राहत असून त्यांच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी रयत शिक्षण संस्थेने स्वीकारली आहे.” आपल्या प्रास्ताविकात डॉ. अनिल पाटील यांनी कर्मवीर भाऊराव पाटील तसेच सौ. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांचे जीवनचरित्र सर्वांसमोर मांडले. कोरेगाव मुक्कामी घडलेला अपमानाचा प्रसंग, साताऱ्यात पाटील मास्तर म्हणून अण्णांनी केलेली सुरुवात, त्यातून चार विद्यार्थ्यांना घेऊन सुरु केलेले वसतिगृह आणि ते चालवण्यासाठी अण्णांनी घेतलेले कष्ट,वहिनींचा त्याग याकडे लक्ष वेधले.

मा. चंद्रकांत दळवी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले, “वहिनींना अधिक आयुष्य लाभले असते तर रयत शिक्षण संस्थेचे आजचे चित्र आणखी वेगळे दिसले असते. कर्मवीरांना रयत माऊलींनी दिलेली साथ अत्यंत महत्त्वाची आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी जे कार्य केले तसेच कार्य कर्मवीर अण्णा व लक्ष्मीबाई यांनी केली आहे. लक्ष्मी वहिनींच्या निधनानंतरही कर्मवीर अण्णांनी संस्थेसाठी रात्रंदिवस काम केले. वहिनींची साथ अधिक मिळाली असती तर रयत शिक्षण संस्था आणखी पुढे गेली असती.” यावेळी त्यांनी डॉ. अनिल पाटील यांचे कौतुक केले तसेच त्यांना कर्मवीर अण्णा, रयतमाऊली सौ.लक्ष्मीबाई आणि रयत शिक्षण संस्था यावर एक पुस्तक लिहून आपले ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचवण्याची विनंती केली. 

यावेळी मा. कलगौंडा पाटील यांनी केलेल्या समर्पित त्यागाबद्दल त्यांचा मरणोत्तर सन्मान करण्यात आला. हा सन्मान मा. संजीवकुमार पाटील, मा. अशोक कलगौंडा पाटील, मा. अनिल कलगौंडा पाटील यांनी स्वीकारला.

साहेबराव घाडगे या सेवानिवृत्त शिक्षकाने १ लाख ५ हजार रुपयांची देणगी दिली. मा. पल्लवी सागर वर्धमाने, सहायक विभागीय अधिकारी एन. टी. निकम यांनी बोर्डिंगसाठी प्रत्येकी २५ हजार रुपयांची देणगी दिली. रा. ब. काळे शाळेच्या पालकांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी जमवलेला ७५ हजार रुपयांचा लक्ष्मीफंड संस्थेकडे सुपूर्द केला. धनिणीच्या बागेत डिजिटल स्वरुपात रयत शिक्षण संस्थेच्या महत्त्वाच्या घटना दर्शवणारे बोर्ड, शिल्प इत्यादी करण्यात योगदान देणाऱ्या विनायक संकपाळ, प्रदीप कुंभार, उमेश देशमुख, बाळासाहेब कचरे, किरण कुंभार या कला शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात प्रा.संभाजी पाटील यांच्या गीतगंधाली कार्यक्रमाने झाली.

रयत शिक्षण संस्थेचे सचिव मा.विकास देशमुख IAS (Retd.) यांनी प्रास्ताविक केले. मा.प्रिं. डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी आभार मानले. सौ. सविता मेनकुदळे यांनी सूत्रसंचालन केले. वसतिगृहाचे अधीक्षक प्रशांत गुजरे यांनी अहवालवाचन केले. कार्यक्रमास कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू मा. प्रिं. डॉ. ज्ञानदेव म्हस्के, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य मा.डी.बी.पाटील,वाय.टी.देशमुख, डॉ.मोहन पाटील,कर्मवीर कुटुंबीय,सहसचिव (ऑडीट) मा. प्रिं. डॉ.राजेंद्र मोरे, सहसचिव मा. बंडू पवार, जनरल बॉडी सदस्य मा. वाय. टी. देशमुख,प्राचार्य शहाजी डोंगरे, प्राचार्य आर. के. शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

बबनराव लोणीकरांना माफी नाही तर ठोका, ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावरून बच्चू कडू भडकले

Post Views: 19 बबनराव लोणीकरांना माफी नाही तर ठोका, ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावरून बच्चू कडू भडकले प्रतिनिधी -भाजपचे नेते बबनराव लोणीकरांवर

Live Cricket