लेखकांनी उलगडला लेखनामागील प्रवास
आम्ही पुस्तकप्रेमी समूह आणि दीपलक्ष्मीतर्फे उपक्रम
सातारा येथील आम्ही पुस्तकप्रेमी समूह व दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लेखक तुमच्या भेटीला या कार्यक्रमामध्ये जेष्ठ लेखिका सौ सावित्री जगदाळे व लेखक श्री सुनील शेडगे यांनी आपला लेखन प्रवास उलगडून दाखवला
दीपलक्ष्मी सांस्कृतिक सभागृहामध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये वैदेही कुलकर्णी यांनी सावित्री जगदाळे आणि सुनील शेडगे यांच्याशी संवाद साधला या कार्यक्रमाच्या समन्वयक म्हणून स्वाती राऊत यांनी काम केले यावेळी व्यासपीठावर आम्ही पुस्तकप्रेमी समूहाचे प्रमुख डॉक्टर संदीप श्रोत्री दीपलक्ष्मी पतसंस्थेचे अध्यक्ष शिरीष चिटणीस महाराष्ट्र साहित्य परिषद कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी उपस्थित होते
कविता,बालसाहित्य आणि कादंबरी या साहित्याच्या प्रांतात लीलया वावरणाऱ्या लेखिका सावित्री जगदाळे यांनी आपल्या लेखन प्रवासाची माहिती देत असताना जसे सुचत गेले तसे लिहित गेले असे प्रांजलपणे सांगितले. मी कोणत्या लिखाणासाठी कोणतेही नियोजन करत नाही. लिहावसे वाटते तेव्हा लिहिते. सुदैवाने मला चांगले प्रकाशक मिळाल्यामुळे लेखन वाचकांपर्यंत पोहोचू शकले असे त्यांनी सांगितले घरात लिखाणाची किंवा वाचनाची संस्कृती नसताना सुद्धा केवळ द भि कुलकर्णी यांच्यासारख्या साहित्यिकांच्या सहवासात आल्यामुळे मला लेखनाची प्रेरणा निर्माण झाली आणि आज मी एवढे साहित्य निर्माण करू शकले असेही त्यांनी सांगितले
व्यवसायाने शिक्षक पण हौसेने पत्रकारिता करणारे लेखक सुनील शेडगे यांनी आपल्या लेखन प्रवासाची माहिती देत असताना आपण नियोजनबद्ध पद्धतीने लिखाण करत असल्याचे सांगितले दैनिकांमध्ये शिक्षकांचे उपक्रम मांडण्याच्या निमित्ताने माझ्या लिखाणाला प्रारंभ झाला त्यानंतर नियोजन करून मी रेडी ते रेवस या पुस्तकाच्या निर्मितीसाठी मोटरसायकलवरून प्रवास केला आणि त्या संपूर्ण अनुभवाचे चित्रण त्या पुस्तकामध्ये केले असे त्यांनी सांगितले पर्यटनाची आवड असल्याने आणि पर्यटनाच्या निमित्ताने विविध लोकांना भेटण्याची संधी उपलब्ध होत असल्याने माझ्या लेखनामध्ये या माणसांची व्यक्तिमत्व आकाराला आली असेही त्यांनी स्पष्ट केले
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर संदीप श्रोत्री यांनी केले आभार प्रदर्शन विनोद कुलकर्णी यांनी केले.
