आंबेनळी घाटावरील वाहतूक बंदीने नागरिक त्रस्त; तीन मंत्र्यांच्या मतदारसंघांना जोडणारा मार्ग ठप्प
प्रतापगड प्रतिनिधी: कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा असलेल्या आंबेनळी घाटावरील अवजड वाहतूक गेल्या दीड महिन्यांपासून बंद आहे. दीड महिन्यापूर्वी घाटात दरड कोसळल्याची घटना घडली होती, मात्र त्यानंतर कोणतीही मोठी पडझड झालेली नसतानाही एसटी बस वाहतूक अद्यापही बंद ठेवण्यात आल्यामुळे स्थानिक नागरिक संतप्त झाले आहेत. विशेष म्हणजे ट्रक आणि टेम्पो यांसारखी इतर अवजड वाहने या मार्गावरून सुरळीतपणे धावत असताना, फक्त एसटी बस सेवेलाच अडथळा निर्माण केला जात असल्याने नागरिकांमध्ये गोंधळ आणि नाराजीचे वातावरण आहे.
आंबेनळी घाटमार्ग हा प्रतापगड परिसरातील तिस गावे, उमरठ तसेच तानाजी मालुसरे यांच्या समाधी परिसरातील अनेक गावांच्या दळणवळणासाठी आधार आहे. रस्ता बंद असल्याने स्थानिक नागरिक, विद्यार्थी आणि व्यवसायिकांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे.सर्वाधिक आश्चर्याची बाब म्हणजे आंबेनळी घाट हा सातारा, वाई आणि महाड या तीन मतदारसंघांना जोडतो आणि या तिन्ही मतदारसंघांचे प्रतिनिधित्व महाराष्ट्रातील महत्त्वाचे मंत्री करत आहेत. साताऱ्याचे आमदार नामदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले हे सार्वजनिक बांधकाम मंत्री, वाईचे आमदार नामदार मकरंद आबा पाटील हे मदत व पुनर्वसन मंत्री, तर महाडचे आमदार नामदार भारतशेठ गोगावले हे फलोत्पादन मंत्री आहेत. एवढ्या उच्चस्तरीय मंत्र्यांचे प्रतिनिधीत्व असूनही, घाट दुरुस्तीसाठी ठोस पावले उचलली गेली नाहीत, असा सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे.
१५ ऑगस्ट रोजी महाबळेश्वरमध्ये मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होणार आहेत, तसेच लवकरच गणेशोत्सव सुरू होणार असल्याने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढणार आहे. त्यामुळे त्यांची गैरसोय टाळण्यासाठी घाट तातडीने सुरू करण्याची मागणी होत आहे.
या गंभीर परिस्थितीवर तात्काळ उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा स्थानिक नागरिक आणि सामाजिक संघटनांनी प्रशासनाला दिला आहे. शासनाने आणि संबंधित विभागांनी तातडीने दुरुस्ती आणि सुरक्षात्मक कामे पूर्ण करून घाटमार्ग खुला करण्याची मागणी जोर धरत आहे.





