मुख्यमंत्री फडणवीसांच्या सभेनंतरही कराड भाजपाच्या हातातून निसटले; आमदार अतुल भोसले यांच्या कूचकामी नेतृत्वावर प्रश्नचिन्ह
कराड(अली मुजावर )प्रतिनिधी :सातारा भाजपा जिल्हाध्यक्ष अतुल भोसले यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या कराड शहरात भाजपाला नगरपालिकेच्या निवडणुकीत लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला आहे. राज्याचे कणखर व विकासाभिमुख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भव्य सभा होऊनही भाजपाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार पराभूत झाल्याने हा निकाल भाजपासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
कराड नगरपालिका नगराध्यक्षपदाच्या अंतिम निकालात अपक्ष/आघाडी समर्थित उमेदवार राजेंद्रसिंह यादव यांनी भाजपाचे उमेदवार विनायक पावसकर यांचा ९ हजार ७३५ मतांच्या फरकाने पराभव केला. यादव यांना २४,०९६, तर पावसकर यांना १४,३६१ मते मिळाली.
सातारा जिल्ह्याच्या एकूण निकालात भाजपाने काही ठिकाणी आघाडी घेतलेली असली, तरी कराडसारख्या महत्त्वाच्या शहरात झालेला पराभव पक्षाच्या जिव्हारी लागणारा ठरला आहे. विशेष म्हणजे, जिल्हाध्यक्ष अतुल भोसले यांचे कराड शहर हे भाजपाचे मजबूत केंद्र मानले जात होते. मात्र अपेक्षेप्रमाणे निकाल न लागल्याने भाजपाच्या स्थानिक नेतृत्वावर टीकेची झोड उठली आहे.
या पराभवाबाबत भाजपाचेच काही कार्यकर्ते उघडपणे नाराजी व्यक्त करत असून, युवा नेतृत्व आमदार अतुल भोसले यांच्या अकुशल नियोजनामुळे आणि संघटनातील दुर्लक्षामुळे हा पराभव ओढवला, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे.दरम्यान, त्याचवेळी मलकापूर शहरामध्ये भाजपाचा नगराध्यक्ष निवडून आल्याने पक्षाला काहीसा दिलासा मिळाला असला, तरी कराडमधील पराभवाने भाजपाच्या राजकीय गणितांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या निकालामुळे कराडच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली असून, आगामी काळात भाजपाला आत्मपरीक्षण करावे लागणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.



