एमपीएससीचा मोठा निर्णय ! अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना ‘केवायसी’ करणे बंधनकारक
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) सोमवारी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीत कोणताही अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना ‘केवायसी’ प्रक्रिया पूर्ण करणे सक्तीचे करण्यात आले आहे, अशी माहिती एमपीएससीने दिली आहे. एमपीएससीने दिलेल्या माहितीनुसार, उमेदवारांना चारपैकी कोणत्याही एका पद्धतीने ओळख पडताळणी (केवायसी) करावी लागणार आहे.
एमपीएससीने दिलेल्या माहितीनुसार, उमेदवारांना चार पर्यायांपैकी एक निवडावा लागेल. पहिला पर्याय आहे आधार ऑनलाइन ई-केवायसी, दुसरा आहे आधार ऑफलाइन पेपरलेस डिजिटल केवायसी, तिसरा आहे आधार ऑफलाइन पेपर आधारित केवायसी, आणि चौथा आहे नॉन-आधार ऑफलाइन केवायसी. अर्ज सादर करण्यापूर्वी ही पडताळणी करणे सक्तीचे आहे
यात आधार ऑनलाईन ई-केवायसी, आधार ऑफलाईन पेपरलेस डिजिटल केवायसी, आधार ऑफलाइन पेपर आधारित केवायसी, नॉन-आधार ऑफलाइन केवायसी या चार पद्धतीने ओळख पडताळणी (केवायसी) करता येणार आहे. ही केवायसी प्रक्रिया अर्ज करण्याआधीच पूर्ण करणे बंधनकारक असेल. याशिवाय एकदाच नोंदणी करताना उमेदवाराने आपला मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी प्रणालीत नोंदवणेही आवश्यक आहे.
जर उमेदवाराने आधार आधारित पडताळणी निवडली, तर आधार क्रमांकाशी संलग्न मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे. ही प्रणाली लागू केल्यामुळे उमेदवारांची ओळख अचूकरीत्या प्रमाणिकरण करता येणार आहे. तसेच फसवणूक आणि चुकीच्या माहितीला आळा बसण्यास मदत मिळणार आहे. विशेष म्हणजे, विशिष्ट ओळख प्राधिकरण आणि राज्य शासनाने एमपीएससीला अधिकृत मान्यता दिली असून, आता भरती प्रक्रिया आणि स्पर्धा परीक्षा यांच्या विविध टप्प्यांवर आधार प्रमाणीकरण वापरता येणार आहे.
