महामार्गावरील अपघाताला टोल नाका प्रशासन जबाबदार प्रकाश गवळी; महामार्ग पोलीसांचाही निष्काळजीपणा
सातारा, दि. १० (प्रतिनिधी)- पुणे बंगळुरु महामार्गावर रविवारी उडतारेजवळ (पाचवड) झालेल्या अपघाताला आनेवाडी टोल नाक्याचे प्रशासन तसेच महामार्ग पोलीस जबाबदार असल्याचे स्पष्ट होत असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य बस, ट्रक, टेम्पो, वाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष प्रकाश गवळी यांनी केली.
महामार्गावर रविवारी उभ्या असलेल्या ट्रकवर कार धडकून झालेल्या अपघातामध्ये दोन महिलांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेबाबत श्री. प्रकाश गवळी म्हणाले, महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी सर्वच टोल नाक्यांना क्रेन, रुग्णवाहिका अशा काही साधनांसह अशा पद्धतीच्या घटना टाळण्यासाठी शासनाने कराराद्वारे जबाबदारी दिलेली असते. त्याशिवाय निधीही दिलेला असतो. त्यामुळे असा एखादा ट्रक किंवा वाहन महामार्गावर बंद पडल्यास तिथे क्रेन पाठवून तो बाजूला करणे व व विनाअपघात वाहतूक सुरळित होईल, यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असते. रविवारी झआलेल्या अपघातापूर्वी सकळी सहाच्या सुमारास हा ट्रक बंद पडला होता. तिथे क्रेन पाठवून बंद अवस्थेतील ट्रक बाजूला करणे आव्यक होते. मात्र, टोल प्रशासनाने हे केले नाही. हा निष्काळजीपणा केला नसता तर काही जीव वाचले असते, असे श्री. गवळी यांनी स्पष्ट केले.
त्याशिवाय अशी दुर्घटना घडू नये, यासाठी आणि ती घडल्यास मदतीची भूमिका महामार्ग पोलीसांनी घेतली पाहिजे. मात्र, प्रत्यक्षात महामार्गपोलीस एका जागेवर उभ राहून केवळ गुन्हे दाखल करण्याचे काम करत असतात. अशा दुर्घटनेच्या वेळी महामार्ग पोलीसांनी मदत करणे महत्त्वाचे ठरते, असे श्री. गवळी यांनी सांगितले. यामुळे टोल नाका प्रशासन आणि महामार्ग पोलीस या दोन्ही यंत्रणांवर कारवाई करायला हवी, असे त्यांनी स्पष्ट केले.
