भारतीय लोकशाही अमृत महोत्सव व वंदेमातरम राष्ट्रीय निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर
विद्यालय गटात वडूजची कल्याणी घाडगे, महाविद्यालयीन गटात वाशी-नवी मुंबईची अनुराधा गायकवाड तर खुल्या गटात मायणीचे प्रकाश भोंगाळे प्रथम
सातारा, दि. २० : येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ, सातारा यांच्या भाषा मंडळ व छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय लोकशाही अमृत महोत्सव व ‘वंदेमातरम’ उत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय मराठी निबंध स्पर्धा २०२५–२६ चा अंतिम निकाल आज जाहीर करण्यात आला.या राष्ट्रीय स्पर्धेला देशभरातून विद्यालयीन, महाविद्यालयीन तसेच खुल्या गटातून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला. भारतीय लोकशाही, संविधानिक मूल्ये, राष्ट्रप्रेम, सामाजिक समता व नागरिकत्वाची जाणीव या विषयांवर स्पर्धकांनी सखोल विचार मांडणारे निबंध सादर केल्याचे आयोजकांनी नमूद केले.
विद्यालयीन गटात (इयत्ता ८ वी ते १० वी) कल्याणी सचिन घाडगे (छत्रपती शिवाजी हायस्कूल, वडूज, ता. खटाव, जि. सातारा) हिने प्रथम क्रमांक मिळवला. राजनंदिनी संभाजी माने (छत्रपती शिवाजी हायस्कूल, वडूज) हिला द्वितीय, तर श्रेया तात्यासो सुडके (सौ. विजयमाला पतंगराव कदम प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, विटा, जि. सांगली) हिला तृतीय क्रमांक प्राप्त झाला.
महाविद्यालयीन गटात (११ वी ते पदव्युत्तर शिक्षण) अनुराधा विकास गायकवाड (एस.वाय.बी.एससी., कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, वाशी, नवी मुंबई) हिने प्रथम क्रमांक पटकावला. अंजली राजेंद्र चांदवडकर (एस.वाय.बी.एससी.आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, नाशिक) हिला द्वितीय, तर साहिल दिलीप आग्रे (टी.वाय.बी.ए., पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पाटपन्हाळे ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) याला तृतीय क्रमांक मिळाला.
खुल्या गटात प्रकाश शिवाजी भोंगाळे (मायणी, ता. खटाव, जि. सातारा) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. प्रभाकर लक्ष्मण बनसोडे (करंजेपेठ, सातारा) यांनी द्वितीय, तर पूनम संभाजी माने (मु.पो. सिद्धेश्वर कुरोली, ता. खटाव, जि. सातारा) यांनी तृतीय क्रमांक मिळवला. महाविद्यालयीन व खुल्या गटासाठी लेखक-कवी प्रा. विश्वजित जाधव, समाजकार्यकर्ता व समता दूत मा. विशाल कांबळे तसेच डॉ. महादेव चिंदे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. तर विद्यालयीन गटासाठी राज्य शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य गुणगौरव पुरस्कारप्राप्त उपशिक्षिका डॉ. शुभांगी कुंभार, उपशिक्षिका सौ. रजनी देसाई आणि प्रा. श्रीकांत भोकरे यांनी परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली.
स्पर्धेतील प्रत्येक गटातील प्रथम क्रमांकास ३,००० रुपये, द्वितीय क्रमांकास २,००० रुपये व तृतीय क्रमांकास १,००० रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा पोवई नाका यांनी काही प्रमाणात आर्थिक मदत देऊन स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले आहे.
या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ २६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा येथे होणार असून कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू मा.डॉ.ज्ञानदेव म्हस्के यांचे हस्ते पारितोषिक वितरण होणार आहे. यावेळी विद्यापीठाचे प्र.कुलसचिव डॉ.विजय कुंभार,विद्यापीठाचे पदाधिकारी ,छत्रपती शिवाजी कॉलेजचे प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे व छत्रपती शिवाजी कॉलेजमधील प्राध्यापक ,विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. या राष्ट्रीय निबंध स्पर्धेचे समन्वयक म्हणून प्रा. डॉ. संजयकुमार सरगडे यांनी प्रभावीपणे काम पाहिले, प्रा.प्रियांका कुंभार व प्रा.श्रीकांत भोकरे यांनी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले. भाषा मंडळाचे प्रभारी संचालक प्रा. डॉ. सुभाष वाघमारे आणि छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा येथील प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे यांनी मार्गदर्शन केले. आयोजकांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन करून सहभागी सर्व स्पर्धक, शिक्षक व नागरिकांचे आभार मानले.




