नवीन महाविद्यालय मान्यता प्रणाली NCPS चे उदघाटन!
मुंबई |मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण व विकास आयोग (माहेड)ची बैठक पार पडली. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नवीन महाविद्यालय मान्यता प्रणाली (New College Permission System – NCPS) या ऑनलाइन प्रणालीचे उदघाटन करण्यात आले. इच्छुक संस्थांना htedu.maharashtra.gov.in/NCPS या संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी निर्देश दिले की, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वेळेत मिळावी यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, इतर मागास बहुजन कल्याण विभाग तसेच आदिवासी विकास विभाग यांनी आर्थिक वर्षाची तरतूद आणि वितरणाचे कालबद्ध नियोजन करावे. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वेळेत मिळावी यासाठी राज्य सरकारच्या वेतन वितरण प्रणालीच्या धर्तीवर शिष्यवृत्ती वितरण प्रणाली विकसित करून त्याचे प्रारूप तातडीने मान्यतेसाठी सादर करावे.
सामाजिक उत्तरदायित्व लक्षात घेऊन राज्यातील समाजकार्य महाविद्यालयांमध्ये आवश्यक बदल करणे गरजेचे आहे. यासाठी विद्यापीठ स्तरावर समिती गठीत करून नवीन समाजकार्य महाविद्यालयांना कायम विनाअनुदानित तत्त्वावर मान्यता देण्यासाठी 3 महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. तसेच कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठास B.Sc. Aviation and Hospitality हा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी संस्कृत व भारतीय ज्ञानप्रणालीशी सांगड घालून विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली.
विधी महाविद्यालयांच्या परवानगीसंदर्भात विधी व न्याय विभागाचा अभिप्राय घेऊन बार कौन्सिल ऑफ इंडियाची ना हरकत प्रमाणपत्र मिळेल त्यांना मान्यता देण्यात यावी. तसेच AICTE, UGC, BCI व NCTE मान्यता देण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमास अन्य विभागाने उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या मान्यतेशिवाय पदविका, नवीन पदविका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रम करण्यासंदर्भात मुख्य सचिव यांच्या स्तरावर समिती गठीत करून उच्च शिक्षण आणि कौशल्य शिक्षण अंतर्गत कुशल व काळानुरूप अभ्यासक्रम तयार करावेत, अशा सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या.
ज्या महाविद्यालयांचे नॅक मानांकन ‘अ’ आहे, अशा निवडक खासगी विद्यापीठांमध्ये वैद्यकीय अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे प्रस्ताव सादर करावा, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या क्षेत्रामध्ये महाविद्यालये सुरु करण्यासाठी स्थळबिंदू निश्चित केले जातात. या स्थळबिंदू निश्चितीच्या 2024 ते 2029 या पंचवार्षिक बृहत् आराखड्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य उच्च शिक्षण व विकास आयोगाच्या (माहेड) बैठकीत माहेडने 2819 मान्यता दिलेले बिंदू होते. यामध्ये इरादा पात्र प्राप्त महाविद्यालय 739 होते त्यापैकी 593 महाविद्यालयांना अंतिम मान्यता देण्यात आली.
यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार डॉ. आशिष देशमुख तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
